Sunday 24 March 2024

खोल दरीत घेतलेली एक साहसी उडी आणि ….

शेवटी मी एकटाच निघालो माझ्या साहसी सहलीवर, ऋषिकेशला. तस एकट्यानेच जायच अस काही ठरवले नव्हते पण बरोबर कोणीच यायला तयार नाही म्हणुन आपण आपली सहल रद्द का करायची? आणि निघालो.

बत्तीस तास मुंबईवरून रेल्वे प्रवासकरुन हरिद्वार गाठलं. स्टेशनच्याच बाहेरुन एक स्कुटी दोन दिवसासाठी भाड्याने घेतली. कोण बसच्या वेळा सांभाळत बसणार आणि परत लोकल फिरण्यासाठी रिक्षा शोधत बसणार. आपली स्कुटी असलेली कधीही चांगली. 




स्कुटीच्या टाकीत पेट्रोल आणि माझ्या टाकीत आलु पराठे भरुन निघालो. फक्त पंचवीस किमीचा प्रवास आणि रस्ता पण चकचकीत तर आरामात हिमालयाचे प्रवेशद्वार असलेल्या आध्यात्मिक आणि योग राजधानी - ऋषिकेशला पोहचलो. ऋषिकेशला पोहचताच पुर्ण पहाडी भाग सुरु झाला, गाडी घाट रस्त्यातुन जाऊ लागली. नुकताच पाऊस पडुन गेला होता त्यामुळे रस्ते पण ओले झाले होते. एका बाजुला डोंगररांगा आणि दुसऱ्या बाजुला गंगा नदीला सोबत घेऊन मी माझ्या सहलीचा जो मुख्य उद्देश होता ते करायला म्हणजेच बंजी जंपिंग साईटला पोहचलो.

तिथे पोहचुन सगळे त्यांचे सोपस्कर पुर्ण केले, जे की जंपची माहीती घेणे, जंपिंगच्या वेळी काय करावे, काय करु नये त्याचबरोबर जुजबी  आरोग्याविषयी माहीती देणे. ह्या नंतर तिथुन मग मी उडी मारतात त्या जागेवर आलो. सुरक्षेसाठी हार्नेस चढवले. मला ज्या काही परत छोट्या शंका होत्या त्याच निरसन करुन घेतल. मुख्य मला भीती होती ती पायला झटका बसण्याची पण त्यांनी सांगितल की असं काही होत नाही. आपल्या वजनाच्या हिशेबाने बंजी (म्हणजेच ताणत जाणारी दोरी) लावलेली असते जी झटका बसुन देत नाही.

आता मी एकदम टोकावर आलो. मला वाटल होत  की थोडी भीती वाटेल पण त्यावेळी मला आठवलं ते म्हणजे अरे कॅमेरा कुठय. कॅमेरामध्ये मी दिसतोय का?  मग कॅमेरामनकडे हात दाखवुन उडी मारयला तयार झालो. एक.. दोन… बंजी…

याहुहुहुहुहु……….. मागुन बंजी बोलताच स्वतःला झोकुन दिल मी त्या दरीत १०० मीटर उंचीवरुन. वेग वाढत वाढत गेला. आकाशातून सुसाट पडण्याचा तो अनुभव खतरनाकच. आता खाली नदीत पडतोय की काय असं वाटत असतानाच ताणत आलेल्या त्या दोरीने परत वर फेकल. बिलकुल झटका बसला नाही. परत खाली खाली खाली आणि परत वर. असं २-३ वेळा झाल्यावर मी स्थिर झालो. हळुहळु मला खाली उतरवल. सगळ मिळुन १ मिनिटाचा खेळ पण आयुष्यभरासाठी पुरुन उरणारा. खाली उतरल्यावर मला माझ्यात धाडस आहे अर्थाच बॅज दिल गेल आणि एक पाण्याची बाटली.

तिथुन छोटा ट्रेक करुन परत त्यांच्या कार्यालयात आलो. माझा जंपिंगचा विडीयो तयारच होता. तो बघुन स्वतःलाच बोललो, मस्त बसलीये जंप. विडीयो घेतला, प्रमाणपत्र घेतल. थोडस काहीतरी खायचं म्हणुन सॅंडविच खाल्ल आणि तिथुन निघणार तोच गाराचा जोरदार पाऊस. जवळपास ३ तास तो चालु होता. आता अडकतोय की काय इकडेच अस वाटत असताना सुदैवाने तो कमी होत गेला आणि रिमझिम पावसातच परत ऋषिकेश शहराच्या दिशेने कुच केली. वाटेत पाऊस पुर्ण थांबला पण हवा थंड होती. हात पुरते गारठले होते. रस्त्यातच एका ठिकाणी थांबुन गरमागरम चहा आणि बनमस्का घेतला. 




ऋषिकेशला पोहचुन पहिल्यांदा मस्त गरम पाण्याने आंघोळ केली. शरीराला गरम पाण्याचा शेक देऊन जरा हायस वाटल आणि तयार होऊन त्रिवेणी घाटावरच्या गंगा आरतीसाठी गेलो. तिथे गेल्यावर कळाल की ऋषिकेशला आध्यात्मिक राजधानी का म्हणतात ते. अगदी मन प्रसन्न करुन टाकणार आल्हाददायक वातावरण. सहा वाजता सुरु झालेली आरती भाविकांच्या भक्तिमय वातावरणात १५-२० मिनिटे चालली. नंतर राम-कृष्णांच्या भक्तीगीतांच्या किर्तनात सगळे छान अर्धातास दंग होऊन नाचले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करुन ऋषिकेशमधले इतर ठिकाणे फिरलो. त्यात लक्ष्मण झुला, राम झुला, गोवा बीच, आणि योग साधनेसाठी प्रसिद्ध असलेल परमार्थ निकेतन आश्रम. थोडावेळ गंगा नदीच्या किनारी शांत बसुन वेळ घालवला आणि जवळच्या प्रसिद्ध चोटीवाला मध्ये जेवुन हरिद्वारला निघालो.




हरिद्वारला पोहचुन, स्कुटी परत केली. तिकडुन हर की पौडी म्हणजेच विष्णुचे चरण जे की हरिद्वारमधील गंगेच मुख्य घाट आहे तिथे निघालो. ह्या ठिकाणाला हिंदु संस्कृती मध्ये धार्मिक दृष्ट्या खुप पवित्र मानले जाते कारण समुद्रमंथनातुन निघालेले अमृताचे काही थेंब इथेही गंगा नदीत पडले होते. आणि इथेच गंगा नदी हिमालयाच्या पर्वतरांगा सोडुन मैदानी भागात प्रवेश करते. इथे गंगा नदी मध्ये स्नान केल्याने आपले सगळे पाप धुऊन निघतात अशी मान्यता आहे. मलाही माझे पाप धुवायचे होते पण थंडी इतकी की मी विचार केला काही काळ पाप घेऊनच जगुयात. बाकी अबालवृद्ध धडाधड नदीत डुबक्या घेत होते. कस काय त्यांनाच माहीत. मी आपली आरतीसाठी जागा पकडुन बसलो. बरोबर ६ वाजता आरती सुरु झाली. मुख्य गंगा आरती करुन सगळे पांगले. मी थोड्स मार्केट फिरुन आरामात वेळ घालवुन हॅाटेलात जेवुन परत रुम वर आलो.

सकाळी साडेसात वाजता परत घाटाच्या दिशेने निघालो. चहा नाश्ता करुन घाटावर आलो. छान ऊन पडलं होत आणि वातावरण कालपेक्षा उबदार होत. आता परत कधी एवढ्या लांब यायला जमेल? तर करुया धाडस आणि हर हर महादेव बोलुन घेतली डुबकी. अजुन दोनवेळा डोक्यावरुन पाणी जाईपर्यंत नदीत डुंबलो, जेणेकरुन सगळे पाप नदीत वाहुन जातील. बाहेर आल्यावर सुर्यदेवांच्या कृपेमुळे थंडी वाजली नाही. कपडे घालुन परत घाटावर फेरफटका मारला आणि रुम वर आलो. तयारी केली आणि आता परतीची वेळ आलीच होती. सामान घेऊन स्टेशनला पायीच निघालो. स्टेशनच्या समोरच एका हॅाटेलात जेवुन घेतलं. स्टेशनवर पोहचल्यावर कळाल की ट्रेन २ः३० तास उशीरा आहे.





वाट पाहण्याशिवाय आता काहीच पर्याय नव्हता. फलाटावरच एक बाकडा पकडुन मोबाईलमध्ये काढलेले फोटो/विडोयोज बघत बसलो. माझी सोलो ट्रिप यशस्वी झाल्याचा आनंद होत होता. आता परत ३२ तासांचा परतीचा प्रवास. पुढली ट्रीप कुठे काढायची हेच शोधत असताना ट्रेन आली आणि मुंबईच्या दिशेने निघालो.