Wednesday 14 December 2016

अलिबाग - बेबीमुन

बेबीमुन, अलीकडेच ह्याची चर्चा जास्त सुरु झाली आहे. लग्नानंतर जोडपं हनिमुनला जातात तस आता तुमच्याकडे गुडन्युज असल्यावर बाळ व्ह्यायच्याआधी जोडप्याने एकत्र फिरायला जाणं.  एक छानशी सुट्टी फक्त दोघांनीच एकत्र घालवायची. मी ही संकल्पना कुठेतरी पेपरात वाचली तेव्हा आम्हीही गरोदरच होतो (आम्ही म्हणजे अर्थात माझी बायको :) ). मला ही कल्पना आवडली आणि मी सुद्धा जवळपासची बेबीमुनसाठी डेस्टिनेशन्स शोधु लागलो. त्यातच आमचा लग्नाचा वाढदिवसही जवळच होता. मग दोन्ही गोष्टी एकत्रच होतील. घरच्यांनाही कल्पना आवडली. तेवढाच रोजच्या गोष्टीतून बदल आणि तरतरीत सुद्धा वाटेल. पण रिस्क नको म्हणून जवळच डेस्टिनेशन ठरवायचं विचार झाला.
मुंबईच्या जवळपास, सोपं आणि उत्तम म्हणजे 'अलिबाग'. मला अलिबागला जाऊन बरेच वर्ष झाली होती आणि मंजुश्रीही इतक्यात तिथे गेली नव्हती. मग ठरलं तर - अलिबाग. मित्रांजवळ तिथल्या हॉटेल्सची चौकशी सुरु केली. तीन-चार नावे भेटली त्यातलंच एक पसंत केलं. इंटरनेटवरून त्या हॉटेलची माहिती भेटली. प्रतिक्रया पण छान होत्या. मग लगेच फोन लावुन बुकिंग कन्फर्म केली. शनिवार ते सोमवार असे ३ दिवस आरामात घालवायचे.
पण शनिवारी अलिबागला गोवा रोडवरून जायचं म्हणजे प्रचंड ट्रॅफिक. त्यापेक्षा आरामात दुपारी घरातुन निघायचं तोपर्यंत पेण, वडखळनाका मोकळा होईल असा अंदाज होता. आम्ही दुपारचे २ वाजले तरी घरातच होतो. तेवढ्यात एक फोन आला. तो फोन हॉटेलमधून होता. "तुम्ही दुपारी हॉटेल मध्ये जेवणार आहात का? कारण हॉटेलचा किचन बंद होईल". आता त्याला कुठे सांगू आम्ही अजुन घरीच आहोत. त्याला सांगितलं कि आम्ही २ तासात पोहोचु. जेवणाची काळजी नाही, आम्ही जेवलोय म्हणून फोन ठेवून दिला.
प्रवासाला सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे रस्त्यात जास्त ट्रॅफिक नव्हती. मध्ये एका ठिकाणी चहासाठी थांबुन वडखळनाका मागे टाकलं. मध्येच खरमरीत रस्ता तर मध्येच एकदम चांगला पण त्यातल्यात्यात चांगलाच म्हणावा लागेल. अलिबाग जवळ आल्यावर मोबाईलवर जीपीएस चालू केला. हॉटेलच नाव टाकुन जीपीएस जसा सांगत होता तसतसे आम्ही जात होतो. "टेक राईट टर्न, आफ्टर १०० मीटर्स टेक लेफ्ट टर्न" अस करत करत आम्ही एकदम जंगलातच आलोय असा भास झाला. सरळ हॉटेलवाल्याला फोन लावला. तो म्हणाला बरोबर आहे या तसेच पुढे. २ मिनीटांनी आमचा जीपीएस "युवर डेस्टिनेशन इज ऍट द राईट." आणि उजवीकडे हॉटेल होतं.
एकदम उत्तम लोकेशन. समोर वर्सोली बीच, आजुबाजूला झाडं, रहदारीपासून दूर आणि हॉटेलही छोटच, फक्त ८-९ रूम्स. म्हणजे तिथेही वर्दळ नव्हती.






आम्ही पोहचलो तेव्हा ५ वाजले असतील. सूर्य मावळतीकडे झुकला होता. हॉटेल्सचे सोपस्कर पुर्ण करुन आम्ही दोघे किनाऱ्यावर फेरफटका मारायला गेलो. मंद वारा, समुद्राच्या लाटांचा आवाज, किनाऱ्यावर मुलांचा रंगत आलेला क्रिकेटचा डाव अगदी मन प्रसन्न करणारं वातावरण होतं ते. अस वाटत होतं की ही वेळ पुढे सरकुच नये पण सुर्यदेव थोडी ऐकणार होते. तो आपला हळुहळु पश्चिम क्षितिजावर आला आणि पाण्यात शांतपणे दिसेनासा झाला. संधी प्रकाशात समुद्रातल्या होड्या किनाऱ्यावर विसावत होत्या. क्रिकेटचा डावही आटोपण्यात आला. भेळ, पाणीपुरीवाल्यांकडे गर्दी वाढली. आम्हीही एक-एक भेळ घेतली आणि हॉटेलवर परत आलो. तो पर्यंत अंधार झाला होता. रात्रीच्या जेवणात चांगला सीफुडचा आस्वाद घेतला.  
दुसऱ्या दिवशी आरामात आवरुन चहा-नाश्ता झाल्यावर आम्ही अलिबाग फिरायला बाहेर पडलो. सर्वात आधी अर्थातच घरी फोन. सर्व उत्तम आहे, तब्येत बरोबर आहे, काही त्रास नाही. फोन झाल्यावर गाडी बिर्लामंदिराच्या दिशेने काढली. बिर्ला मंदिर जेमतेम ३० किमी पण छोटा रस्ता आणि थोडेफार खड्डे म्हणून आम्ही आरामातच गाडी पुढे नेत होतो. अलिबाग-मुरुड/जंजिरा रस्त्यावर रेवदंडा मागे टाकल्यावर एक खाडी पुल ओलांडून लगेच बिर्ला मंदिरासाठी डावीकडे वळायचं. मंदिराबाहेर आपल्याला नेहमीप्रमाणेच हारवाले भेटतील जे तुम्ही गाडीतुन उतरल्या उतरल्या मागे लागतात. गेट मधुन आत गेलात कि फोटोग्राफीला मनाई आहे. मंदिर टेकडीच्या माथ्यावर आहे आणि तिथपर्यंत जायला पायऱ्या. पायऱ्यांच्या बाजूने गार्डन्स. आम्ही पोहचला तेव्हा नुकतच मंदिर बंद झालेलं. तरी दरवाज्याच्या जाळीतुन मुर्तीच दर्शन झालं. मुख्य मंदिर गणपती आणि रिद्धी-सिद्धी दोन्ही बाजुला, सभोवताली शंकर-पार्वती आणि राधा-कृष्ण ह्यांचेही छोटेखानी गाभारे आहेत. अगदी सुंदर मंदिर, मंदिराचे कर्मचारी स्वच्छतेची विशेष काळजी घेत असतात. मंदिराच्या परिसरात थोडास फिरुन झाल्यावर खाली परत आलो. एक-एक नारळपाणी आम्ही दोघांनी घेतला आणि परत अलिबागला फिरलो.



रेवदंड्याचा किनारा एकदम छान आहे अस ऐकलं होतं, म्हणुन रेवदंड्याला पोहचल्यावर गाडी शहरात घुसवली. अगदी निमुळते रस्ते त्यात रविवारचा बाजार, रस्तावरची रहदारी. आम्ही कदाचित रस्ता चुकलो होतो आणि त्यात गर्दीमुळे खुप वैताग आला. मग सरळ रेवदंडा बीचच बेत रद्द करुन पुढे निघालो आणि नागाव बीचवर आलो. सूर्य चांगलाच वर आला होता आणि उन्हाचे चटके बसत होते. गाडी पार्किंग पण एकदम उन्हात भेटली. बीच एकदम गजबजलेलं. रविवार म्हणजे मुंबई-पुण्याचे पर्यटक इकडे जास्त येतातच. समुद्राला ओहोटी असल्याने पाणी एकदम आत होत आणि समुद्रकिनारा त्यामुळे अजुनच मोठा वाटत होता. घोडागाडी, बनाना राईड, मोटारबोट असा सगळं काही त्या बीचवरआहे. परफेक्ट फॅमिली पिकनिक स्पॉट. सीफुड आवडणाऱ्यांची तर मजाच मजा. बीचवर लाईनने हॉटेल्स आणि सगळ्या हॉटेल्स मध्ये पापलेट थाळी, सुरमई थाळी, बांगडा थाळी मेनु मध्ये वर. म्हणजे मेनुच तो आहे. लिहितानाही माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. व्हेज आणि चिकन थाळी पण आहे. आम्ही मस्त पापलेट थाळीवर ताव मारला. एकदम छान पापलेट फ्राय, त्याबरोबर कोळंबीचा रस्सा, तांदळाची भाकर आणि भात. पोटभर जेवुन झाल्यावर आम्ही परत अलिबाग मध्ये आलो.






अलिबाग बीच वर जास्त वर्दळ जाणवली नाही. शाळेच्या सहलीतली मुलं आणि मोजके पर्यटक. बहुतेक करून सगळे नागाव, काशीद बीच वरच जास्त जात असतील. अलिबाग बीचवरुन समोर कुलाबा किल्ला दिसतो. मी ऐकलं आहे कि ओहोटीच्यावेळी आपण चालतही किल्ल्यात जाऊ शकतो. खरं काय ते मला नाही माहीत. तिथे जास्त वेळ न घालवता आम्ही परत हॉटेलवर आलो कारण मुख्य म्हणजे आम्हाला बीचवर प्रीनॅटल फोटोशुट करायचा प्लॅन होता आणि आमचा हॉटेल होतं ते बीच उत्तम होतं.





चहापाणी झाल्यावर आम्ही बीचवर आलो आधी मी मंजुश्रीचे एकटीचे फोटो घेतले. आम्ही त्यासाठी गुगल वर आधीच बरेचसे पोझेस बघून ठेवले होते. त्यातले जे जमतील तसे फोटो काढले. आता वेळ आली ती दोघांचे फोटो काढायचे आणि त्यातच खरी मजा होती. कारण आमच्या दोघांचे फोटो कोण काढणार? बीच वर आम्ही आमचा फोटो कोण काढु शकतो, हा विचार करत येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडे नजर टाकु लागलो. एक १५-१६ वर्षाची मुलगी आपल्या आईबरोबर बीचवर फिरत होती. आम्ही विचार केला हि काढु शकते, तिला कदाचित आवडेल आणि तिला विचारलं. पण आमच्या अपेक्षेपेक्षा उलट तिने थोडीसी नाराजी दाखवताच कॅमेरा हातात घेतला. तिने फक्त २ फोटोतच आम्हाला कॅमेरा परत दिला आणि निघून गेली. आम्ही विचार केला काय झाला हिला , आमचे पोजेस पण साधेच होते. जसा काय आम्ही हिला .... जाऊदे!! मग एक नवरा-बायको आपल्या ३-४ वर्षाच्या मुलाबरोबर बीचवरुन हॉटेलवर पार्ट जात होते. आमच्याच हॉटेल मध्ये थांबले होते आणि मुंबईतुन आलेले वाटले. त्यांना गाठलं. त्यादोघांमधल्या तिने उत्साहाने कॅमेरा घेतला. आम्ही पुन्हा पोजेस द्यायला सुरुवात केले आणि तिनेही फोटो काढले. कॅमेरा परत देताना तिने विचारलं "न्युली मॅरीड?". मी फक्त मंजुश्रीच्या पोटाकडे बघितलं आणि तिला कळलं . एवढा वेळ तु आमचे फोटो काढत होती तुला कळलं नाही. कमल आहे बाबा! ती पुढे गेल्यावर आम्ही एवढे हसलो आणि मनोमन सुखावलो की ३ वर्षांनंतरही लोकांना आम्ही न्युली मॅरीड वाटतो. अजूनही आमची फोटोंची हौस भागली नव्हती. २-३ पोजेस अजुन डोक्यात होत्या. मग २ मैत्रिणींना पकडलं. त्यांनी मात्र काहीही आढेवेढे न घेता आमचे पाहिजे तसे फोटो काढले आणि जाताना शुभेच्छाही देऊन गेल्या. मग जवळच दगडावर बसुन आम्ही काढलेले फोटो बघितले. पाहिजे तसे बऱ्यापैकी फोटो निघाले होते. सुर्य मावळेपर्यंत तिथेच बसून राहिलो आणि हॉटेलवर परत आलो.


सकाळी उठून आम्ही मुंबईला निघालो. अगदी मनासारखी सुट्टी झाली होती. आता परत अलिबागला येऊ तेव्हा आम्ही दोघांचे 'चार' झालेले असु हो चार! जे त्या दोन मैत्रिणींनाही आमच्या एका पोज वरून लगेच समजलं.

मयुरेश मांजरे
+९१ ९८६९७५६३३०