Saturday 29 August 2015

जव्हार

मान्सुन सुरु झाला कि सगळ्यांना ओढ लागते ती पावसाळी पर्यटनाची आणि आपसुकच जवळपास निसर्गसंपन्न असणाऱ्या ठिकाणांची शोध सुरु होते. मुंबईकरांची पहिली पसंती म्हणजे माथेरान, लोणावळा, माळशेज घाट नाहीतर भंडारदरा. ह्याचबरोबर मुंबई-नाशिक पासून जवळच असलेलं आणखी एक थंड हवेचं ठिकाण म्हणजे जव्हार, ज्याच्या विषयी बऱ्याच कमी जणांना माहिती आहे.
जव्हार म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात एका डोंगरावर वसलेलं एक छोट शहर. मुंबईकरांसाठी उत्तम वीकेंड डेस्टीनेशन. इथे तशी लोकांनी गर्दी केलेली नसल्यामुळे अजुनही शांत आणि प्रसन्न. मुंबईवरून तुम्ही निघालात कि ३-४ तासात इथे पोहचता येईल. मी मागच्या आठवड्यात इथे गेलो होतो. सकाळीच प्रवासाला सुरुवात केली. मुंबई-अहमदाबाद हाईवे घेऊन चारोटी नाक्यावरून उजवीकडे जाणारा रस्ता पकडला. इथुन ४०-४५ किमीवर जव्हार. चारोटीनाका ते जव्हार रस्त्यावर जरा पावसामुळे खड्यांनी आक्रमण केले होते पण त्यातल्यात्यात बरा म्हणता येईल. हा रस्ता तुम्हाला कंटाळा मात्र मुळीच येउन देणार नाही. नद्या, भातशेती सगळा एकदम हिरवागार परिसर आणि रस्ता एकदम गर्द झाडीतुन जाणारा. आमची गाडी जवळपास १२ वाजता आधीच बुक केलेल्या रेसोर्टच्या गेट मध्ये शिरली. रेसोर्टचा परिसर हि छान, शांत आणि प्रसन्न होता. त्या समोरच जयसागर लेक परिसराच्या शोभेत भर घालत होता.




थोडस फ्रेश झाल्यवर रीसेप्शन मधुन जव्हार मधल्या ठिकाणांची माहिती घेतली. जेवण झाल्यावर आम्ही बाहेर पडलो. सर्वात आधी आम्ही तुलनेने लांब असलेल्या ठिकाणी जायचं ठरवलं ते म्हणजे दाभोसा धबधबा. महाराष्ट्रातल्या उंच धबधब्यापैकी एक. ह्या धबधब्याच पाणी हे तीनेशे फुट उंची वरून खाली पडत. इथे जायचा रस्ता म्हणजे महाभयानक. रस्ता नाहीतच जमा आहे. पुर्ण खड्यांमध्ये रस्ता हरवुन गेलेला. असा जवळपास १५ किमी मध्ये येणारे खड्डे चुकुवून कसेबसे आम्ही धबधब्याजवळ पोहोचलो. सर्वात आधी आपल्याला दर्शन होते ते म्हणजे उंचावरून. आपल्याला समोर तीनशे फुट खोल दरीत कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा दिसतो. विलोभनीय असा दृश्य. त्यानंतर तुम्ही दरीत उतरून जवळही जाऊ शकता. पण उतरताना विशेष काळजी घ्यावी लागेल कारण पायवाट हि एकदमच उतरणीची आहे आणि पावसामुळे रस्ता निसरडा असण्याचीही शक्यता आहे. परत चढताना तर खूपच दमछाक होते.



इथून पुढे आम्ही पुन्हा आल्या रस्त्याने मागे फिरलो ते खडखड धरण बघायला. रस्त्यामध्ये विचारत विचारत आम्ही धरणाजवळ पोहोचलो. धरणतसा मोठा आहे पण सांडव्यावरून पाणी वाहत असतानाचे पाहण्यास काही मिळाले नाही कारण धरण अजून पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. तिथून पुढे आम्ही शिरपामाळला भेट दिली. 
शिरपामाळला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महारांजाच्या पद्स्पर्शामुळे. महाराज सुरतेवर स्वारीसाठी निघाले होते तेव्हा जव्हारात त्यांचे स्वागत राजा विक्रमांनी ह्याच ठिकाणी केले. इथे एक भगवा झेंडा सदैव फडकत असतो. थोडसं उंचावर असल्यामुळे इथुन दिसणारे दृश्य आपल्या कॅमेरात टिपल्याशिवाय जाऊच शकत नाही. खडखड धरणामुळे तयार झालेला जलाशय हि इथून दिसतो. इथुन आम्ही परत आमच्या रेसोर्टवर आलो. संध्याकाळचा चहा झाल्यावर सनसेट पाहायला गेलो. त्या आधी जयसागर लेकला हि भेट दिली. अगदी शांत, सुंदर आणि गर्द झाडीत ह्या लेकचा बंधारा आहे. सनसेटला पोहचलो तेव्हा सुर्य ढगांमागे आधीच लपलेला होता. संध्याकाळचे ते निसर्गाचे रूप अतिशय मनमोहक. दरीत ४-५ घरे दिसतात. इतरत्र सगळीकडे भातशेती दिसते. सुर्यास्त हा ढगांमागेच झाला आणि आम्ही तिथून परतलो.









दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आटपुन काळ-मांडवी धबधबा पाहयला निघालो. हा धबधबा बराच आडवाटेला आहे. जव्हार पासुन १०-१२ किमीवर आणि पुन्हा इथे दोन किमी चालत जावा लागता. पार्किंगला जागा आहे पण जिथे पार्किंग करतो तिथे फक्त एक स्थानिक गावकऱ्याच घर आहे आणि त्याच्या भरवशावर गाडी सोडुन तुम्ही जाऊ शकता पण इथे ग्रुप ने गेलात तरच बर, आम्ही अर्ध्यातुनच मागे फिरलो कारण पुन्हा पावसालाही सुरुवात झाली होती आणि पुर्ण वाटेत आम्ही एकटेच होतो. कोणीही पर्यटक आलेले दिसत नव्हते ,आमची गाडीही एकटीच होती.  त्यानंतर पुन्हा जव्हारला परतुन राहिलेले हनुमान पॉईन्ट आणि जयविलास वाडा बघितला.






हनुमान पॉईन्टला एक हनुमानाचं मंदिर आहे आणि इथून जव्हारच्या पुर्वेला पसरलेला निसर्ग दिसतो. जयविलास वाडा हा खाजगी मालकीचा असुन वाड्याच्या देखभाल करणारे चिरीमिरी घेऊन वाडा आतमधुन दाखवतात. हा वाडा १९४२ साली जव्हारचे तत्कालीन राजांनी बांधला. आता त्यांचे वशंज वास्त्याव्याला पुण्यात असतात पण अधुनमधून इकडे फिरकतात. वाडा बघुन झाल्यावर आम्ही जेवण करून परत मुंबईच्या  प्रवासाला लागलो. गर्दीपासुन दुर, शांत आणि निसर्गाची ओढ असणारे नक्कीच जव्हारला पसंती देतील.

मयुरेश
mayuresh.manjre@gmail.com

Sunday 19 April 2015

अष्टविनायक २

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे आम्ही सगळे आवरून तयार झालो. चहा झाल्यावर हॉटेलमधुन निघायची लगबन सुरू झाली. तोवर बऱ्यापैकी उजाडल होत. हॉटेल टेकडीवर असल्याने सकाळचा तो निसर्गरम्य परिसर मन प्रसन्न करणारा होता. थोडे फोटो टिपुन झाल्यावर 'गणपती बाप्पा मोरया' करून आम्ही रांजणगावाच्या दिशेने निघालो.
वाटेतच पोटभर नाश्ता करुन रांजणगाव, जे आता गाव राहिल नसुन एक चांगल औद्योगिक नगर झाल होत तिथे पोहचलो. मंदिराचा तर कायापालट केला आहे. भोवताली बाग, महागणपतीची चित्ररूपी कथा, दर्शन बारी, भक्त निवास अगदीच छान. इथे दर्शनाला थोडीफार गर्दी होती. दर्शन झाल्यावर परिसराचे पटापट फोटो काढले. मंदिराबाहेरच्या बाजारातुन घासाघिस करून आवळे, काकड्या असा सटरफटर खरेदी करुन आम्ही परतलो. आता पुढचा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नेश्वर. गणपती बाप्पा मोरया.
ओझरला पोहचायला १-१:३० तास होता. वाटेत सगळ्यांना मी महागणपतीची आणि विघ्नेश्वराची कथा ऐकवली. ओझरला पोहचलो तर ओझरही आता पुर्वी सारख नव्हत. मंदीराभोवतालची भक्कम तटबंदी आधी दुरूनच उठुन दिसायची पण आता हिच तटबंदी परिसरात उभ्या राहिलेल्या इतर इमारतींमध्ये झाकुन गेली आहे. पार्किंग मधल्या गाड्या बघुन वाटले की खुप गर्दी असेल पण सुदैवाने ती अजिबात नव्हती. दर्शनानंतर जेवण झाल आणि लेण्याद्रीला निघालो.
लेण्याद्री, यात्रेतला आमचा शेवटचा गणपती. मंदीर डोंगरातल्या लेण्यांमध्ये असुन चढण बरच आहे. वाटेत असणारी माकडे तर भाविकांना हैराण करून सोडतात. हातातील पाण्याची बाटली, पिशव्या ते सर्रास खेचतात. चढताना जरा सावधच राहव लागत. मंदीर म्हणजे डोंगराचा दगड पोखरून बनवलेली लेणी आणि त्यात गिरिजात्मजाची स्वयंभु मुर्ती. दर्शन घेऊन खाली उतरताना पुन्हा माकडांपासुन लांब राहण्याचा प्रयत्न केला. उतरल्यावर मस्त चहा मारुन परतीच्या प्रवासाला निघालो. 
अष्टविनायकाची यात्रा ही ज्या गणपतीच्या दर्शनानंतर सुरू केली त्याच गणपतीच्या दर्शनाने शेवट करायाचा असतो असे कुठे तरी ऐकले होते म्हणुन पुन्हा वरदविनायकाच दर्शन घेतल आणि आमच्या यात्रेचा शेवट झाला.








#अष्टविनायक #रांजणगाव #महागणपती #ओझर #विघ्नेश्वर #लेण्याद्री #गिरिजात्मज 
#Ashtvinayak #ranjangaon #mahaganpati #ojhar #vighneshwar #lenyadri #girijatmaj

Sunday 12 April 2015

अष्टविनायक

गेले २-३ वर्षे माझ्या मनात अष्टविनायकाला जाण्यची इच्छा होती पण ह्या न त्या कारणामुळे नेहमी लांबत चाललेली होती. शेवटी मनाशी सगळ्यांनी निश्चय करुन एक शनिवार-रविवार निवडला.  जवळचे ठराविक आप्तेष्ट आणि मित्रपरिवारांना विचारले आणि आम्ही सगळे मिळुन १५ जण ट्रिप साठी तयार झालो. मग मिनी बस करून जायचं ठरल.
शनिवारी पहाटे ५ ला निघायचे ठरले होते. आम्ही सगळे वेळेवर उठुन तयार झालो. ड्रायव्हरला फोन लावला तर तोही इमारती खाली येऊन आधीच हजर होता. भराभर आम्ही खाली उतरलो आणि आज्जीने खणखणित आवाजात गणपती बाप्पा ची साद दिली, सगळ्यानी मोरया म्हणत प्रतिसाद दिला आणि आमची बस निघाली. वाटेत बाकीच्या मंडळींना घेऊन आमच्या बसचा प्रवास आमचा पहिला गणपती महड गावच्या वरदविनायकाच्या दिशेने सुरु झाला. मुंबई-पुणे एक्सप्रेस हाईवेवरुन बस सुसाट निघाली. आता चांगल उजाडल होत. बस जुन्या रस्त्यावर येताच मी थोडा टाइमपास म्हणुन आजुबाजीची माहीती देऊ लागलो. कर्नाळा किल्ल्याचा सुळका, माथेरानचा डोंगर, मोरबे धरण जे रस्त्यावरुन दिसत होते. बस महडला पोहचताच सगळयाना जसे इतर टुर वाले देतात तशी अर्ध्यातासात परतण्याची उगाचच सुचना दिली. मंदिरात फारसी गर्दी नव्हती. दर्शन झाल्यावर परतताना एक ग्रुप फोटो काढला. अष्टविनायकाच्या गणपतींचा महिमा जाणुन घेण्यासाठी एखादे पुस्तक घ्यावे ह्या निमित्ताने दुकानात घुसलो. पण प्रत्येक गणपतीची कथा एका पानाचीच होती. मग मी आणि माझ्या पत्नीने ते विकत घेण्याऐवजी २-३ पानांचे मोबाईलवर फोटो काढले. सगळे बस मध्ये परतल्यावर 'गणपती बाप्पा मोरया' करताच आमची बस पुढच्या गणपतीला म्हणजेच पालीच्या बल्लाळेश्वरच्या दर्शनाला निघाली.
पालीला पोहचायला १ तास होता. मी पुन्हा काहीतरी टाइमपास म्हणुन गाईडच्या भुमिकेत शिरलो. महड आणि पालीच्या गणपतीची माहिती मघाशी काढलेल्या फोटोंमधुन वाचली. सर्वाना ही माहिती जसे टुर गाईड सांगतात तशी कथेच्या रुपात सांगितली. असाच टाइमपास करत पालीला पोहचलो. इथेही गर्दी नव्हती.आरामात दर्शन झाल. भुकही जाम लागली होती. मंदीराजवळच्या एका हॉटेलात भरपेट नाश्ता झाला. आता पुढचा पल्ला बराच लांबचा होता. तो म्हणजे थेऊर गावचा चिंतामणी. नाश्ता आणि सकाळी लवकर उठलेले मग आता सगळेच सुस्तावलेले. गणपती बाप्पा मोरयाच्या गजराबरोबर बसने वेग धरला आणि आम्ही डुलक्या काढु लागलो.
दुपारी २ च्या सुमारास आम्ही थेऊरला पोहचलो. नाश्ता करून बराच वेळ झाला होता आणि परत चांगलीच भुक लागली होती. बसमधुन उतरल्यावर कळाले कि प्रसाद भोजनाची सोय २ वाजेपर्यंत असते. मी पळत जाऊन बघितल तर ते म्हणाले अजुन चालु आहे बसुन घ्या. आधी दर्शन करून घेतो म्हणालो तर ते म्हणाले बंद होईल, जेवा मग दर्शनाला जा. आम्ही पण मग आधी पोटोबा मग विठोबा ह्या विचाराने प्रसादाचा आस्वाद घेतला आणि दर्शनाला गेलो. पेशव्यांचा प्रभाव मंदिराच्या रचनेतुन ठिकठिकाणी जाणवत होता. इथेही दर्शन छान झाल. दर्शनानंतर आम्ही पेशवे माधवरावांच्या पत्नी रमाबाई ज्या सती गेल्या होत्या त्यांची समाधी पाहायला गेलो. मंदिरापासुन १० मिनिटांवर आहे. तिथुन पुढे आम्ही मोरगावला निघालो. वाटेत मी सगळ्यांना थेऊर आणि मोरगावची कथा सांगितली. गणपती बाप्पा मोरया करत मोरगावची वाट पाहु लागलो.
मोरगावला थोडी गर्दी होती कारण जेजुरी जवळच आहे आणि जेजुरीला येणारे भाविकसुद्धा मोरगावला येतातच. रांगेत अर्धा तास गेला पण दर्शन मनसोक्त करता आल. रेटारेटी, ढकलाढकली असा प्रकार तरी नव्हता. मंदिराच्या परिसरात पुजा, आरत्या चालु होत्या. काही टुर ग्रुप हे करत होत. मंदिराबाहेर आल्यावर नेहमीचा ग्रुप फोटो काढला. आता सगळ्यांना चहाची तलप लागली होती. मस्त गरमागरम चहा झाल्यावर आम्ही दिवसाच्या शेवटचा गणपती सिद्धीविनायकाच्या दर्शनाला म्हणजेच सिद्धटेकला निघालो.
पुर्वी सिद्धटेकला जायचा म्हणजे होडीने नदी ओलांडायची आणि सगळ्यांना ह्याच नक्कीच कुतूहल असायच पण आता नदीवर पुल झाल्यामुळे गाडी मंदीराच्या दाराशी थेट जाते. इथे पोहचेपर्यंत तर अंधार पडला होता. मंदीरात कोणीच नव्हते. डोळेभरुन दर्शन घेता आल. दर्शनानंतर कुठे राहयची चांगली सोय आहे का ह्याची शोधाशोध सुरू केली. जवळच एका लॉज मध्ये सोय झाली. रात्रीची आरती मिळाली. त्यानंतर जेवण मस्तच झाल. गरमागरम भाकरी, बटाटा, डाळभात. आपल्या भाषेत म्हणायच तर मराठमोळ बफेट जेवण फक्त ९० रूपयात. एवढ करून आजचा दिवस संपवला.










 
#अष्टविनायक #महड #वरदविनायक #पाली #बल्लाळेश्वर #थेउर #चिंतामणी #मोरगाव #मयुरेश्वर #सिद्धटेक #सिद्धिविनायक 
#Ashtvinayak #mahad #varadvinayak #pali #ballaleshwar #theur #chintamani #Morgaon #Mayureshwar #siddhatek #Siddhivinayak