Thursday, 9 April 2020

नवलाई

आधीच जेटलॅग त्यात इथे युकेला मे महिन्यात सूर्य सकाळी ५ वाजताच उजाडला. अरे रात्री १० वाजेपर्यंत उजेड आणि सकाळी ५ वाजल्यापासून परत. झोपायचं कधी इथे उन्हाळ्यात. त्याच्यावर कहर म्हणजे रूम मध्ये पंखा नाही. कट्टर मुंबईचा राहणारा माणूस हा कितीही थंडी (म्हणजे त्याला मुंबईत थंडी पडते असा एक गैरसमज आहे) असली तरी पंखा त्याला फुल स्पीड मध्येच लागतो आणि असा मी कट्टर मुंबईकर बिना पंख्याचा कसा झोपलो असेल माझे मलाच आठवत नाही. एकतर ती भयाण शांतता आणि रस्त्यावरून गाडी गेली कि तिचा सुईंगगगगगग आवाज.
त्यामुळे माझी चुळबुळ ४ वाजल्यापासूनच सुरु होती. शेवटी ६ वाजता उठून आवरायला घेतलं. मी तयार होईपर्यंत प्रणाली पण उठली. मी नको नको म्हणेपर्यंत तिने माझ्यासाठी डबा बनवला. माज्यापेक्षा कदाचित तीच जास्त काळजीत होती. आपला छोटा भाऊ पहिल्यांदा शाळेत जातोय तेव्हा जशी काळजी घेतली जाते तशी ती घेत होती. नंतर रेल्वे स्टेशनला सोडायला पण आली. तिला वाटलं असेल जाईल कुठल्या तरी भलत्याच ठिकाणी. 
स्टेशन मध्ये गेल्यावर खरी मजा सुरु झाली. मी तिकिटाच्या रांगेत उभा राहिलो. माझा नंबर आल्यावर मी तिकीट खिडकीच्या पलीकडे बसलेल्या बाईला मला काय हवं आहे ते सांगितलं. बर हे आपल्यासारखं डायरेक्ट सांगायचं नसतं, मी बाहेरून एका माईक मध्ये बोलणार, त्याला ती उत्तर पण तिच्या माईक मधुन देणार आणि आमच्या दोघांच्या मध्ये एक काच. देवाण घेवाणसाठी काचेत एकदम छोटीशी फट.
माईक मधुन मी बहुतेक पहिल्यांदाच बोलत असेल माझ्या उभ्या आयुष्यात. मागे एकदा शाळेच्या स्नेहसंमेलनात गाणं बोलायचा योग आला होता पण तेव्हा ऐनवेळी शिक्षकांनी माझ्या हातातला माईक हिसकावुन दुसऱ्याच्या हातात दिला. कदाचित माझ्या शिक्षकांनी पुढे काय होणार हे आधीच हेरलं असावं. 
माईक मध्ये माझा आवाज तिला कसा ऐकायला गेला हे मी तरी सांगु शकणार नाही पण तिचा आवाज मला सगळ्या स्पीकर मधुन आवाज येतो तसाच  म्हणजे अस्पष्ट, थोडासा फाटलेला ऐकु आला. त्यात मी सांगितलं ते माझ्या भारतीय अस्सल इंग्रजीत. आपल्याला मुंबईत तेरेको मेरेको हिंदी ऐकायची सवय झाली असताना जर कोणी येऊन अस्खलिखित हिंदीत बोलायला लागलं तर त्याला बोलु
"क्या बोलणेका हे तेरेको, सीधा सीधा बोल" 
तशीच काहीतरी तिची अवस्था झाल्यासारखी मला वाटली. तरी आम्ही थोड्याफार वाटाघाटी करत एकमेकांना काय हवं ते समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो.   
पास काढताना कोणी "हावस" विचारेल का? शेवटी ते हावस नसुन हाऊस आहे हे मला जेव्हा कळलं तेव्हा आमची कोंडी फुटली आणि एकदाच तिकीट घेतलं.
तिकीट घेतल्यावर परत मी दबकतच तिथे एकाला विचारलं "साल्सबरी ट्रेन?" अगदी नेमकं आणि मोजक्या शब्दात. नशीब त्यालाही कळलं आणि त्याने मला प्लॅटफॉर्म नंबर सांगितलं. 
त्या प्लॅटफॉर्मवर पोहचल्यावर पुढची पंचाईत म्हणजे तिथे दोन ट्रेन उभ्या होत्या. हो एका प्लॅटफॉर्मवरच २ ट्रेन. शेवटी हा पेच स्वतःहूनच सोडवायचा मी ठरवलं. प्लॅटफॉर्मवरचे इंडिकेटर बघितले, अजून २-३ इंडिकेटर बघितले आणि समजले कि त्यांनी प्लॅटफॉर्म दोन भागात विभागले आहेत. 
अ आणि ब आणि माझी ट्रेन ब वर होती. 
पण आपल्याला जे समजल ते बरोबर आहे ह्याची खात्री केलेली बरी म्हणुन ट्रेन मध्ये चढायच्या आधी परत विचारून घेतलं 
जवळपास ४० मिनिटाच्या प्रवासानंतर ट्रेन साल्सबरीला पोहचली. स्टेशन बाहेर आल्यावर सरळ टॅक्सी केली. त्याला ऑफिसचा पत्ता टेकवला. प्रवास चालु असताना अस्सल मुंबईकर विचार मनात चालु होते. हा बरोबर सोडेल ना? उगाच फिरवणार तर नाही ना? परत मीटर प्रमाणेच पैसे घेईल कि काहीही सांगेल. वाद घालायची वेळ आलीच तर कशी घालणार. पण मला त्याने २-३ मिनिटात तिथे सोडल आणि मीटर जेवढ दाखवत होता तेवढेच पैसे त्याने माझ्याकडून घेतले. 
ऑफिस मध्ये पोहचल्यावर एका मित्राने माझं स्वागत केलं. 
मी पोहचायच्या आधीच ऑफिस भरलेले होते. सगळॆ आपापल्या कामात मग्न. एकदम चिडीचुप शांतता.
मित्राने मला ऑफिसची ओळख करून दिली. माझ्यासाठीचा टेबल आधीच ठरलेला होता. त्यानंतर ब्रेकआऊट एरिया, चहा कुठे भेटतो (व्हेंडिंग मशीन वाला फुकटचा), वॉशरुम सगळी ओळख करुन दिली.
सगळं झाल्यावर तो आपल्या कामात. मग मी पण आपलं डोकं मला जो टेबल दिला त्याच्यावरच्या कंप्युटर मध्ये घातलं. त्यानंतर थोड्यावेळाने गाठीभेटी, तसे सगळे ओळखीचेच होते. ज्यांच्याशी एवढे दिवस भारतातुन फोन वर बोलत होते ते प्रत्यक्ष भेटत होते. जुजबी बोलणं, कसा झाला प्रवास वगैरे वगैरे आणि त्या नंतर परत शांत.
आयटी क्षेत्रात टेबलवर फायलींचा खच नसतो तर आउटलुक मध्ये ई-मेल्सचा खच असतो. कामांची देवाणघेवाण ई-मेलनेच होत असते. अगदी बाजुला बसलेल्या माणसाला ही माझ्याकडून काय हवं असेल तर तो ई-मेल पाठवेल आणि मी सुद्धा उत्तर ई-मेलनेच देईल. हे फक्त तिकडेच नाही तर संपुर्ण आयटी मध्ये असच आहे.
१२:३० च्या दरम्यान ही शांतता भंग झाली ती एका माणसाच्या ओरडण्याने, मी बघितलं एक वयस्कर इसम काहीसा ओरडत ओरडत पुर्ण मजल्यावर फिरत होता. मजल्यावरची अर्धीएक जण ब्रेकआऊट एरिया दिशेने गेली. मी माझ्या मित्राकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तर त्याने जवळ येऊन सांगितलं सॅन्डविचवाला आहे.
मित्राला विचारलं जेवायला कधी जातोस, मला सांग तर तो "इथे सगळे आपलं आपलं जेवून घेतात."
"तु पण तुला भुक लागेल तेव्हा जेव इथे टेबलवरच"
मी आजुबाजुला बघितलं तर बऱ्याच जणांनी आपलं सँडविच टेबलवरच बसून खायला सुरुवात केली. काही जन काम करत करत तर काही जण बातम्या वाचत, पुस्तके चाळत. पण आपल्यासारख गप्पांचा फड नाही.
मी मात्र ब्रेकआऊट मध्ये जाऊन जेवण उरकल.
त्यानंतर परत आपल्या कामात गुंग झालो. ३ च्या दरम्यान मला त्या चिडीचुप शांततेत बाजुच्याने विचारलं
"ऐनी थिंग टू ड्रिंक?"
हे त्याने ई-मेल मध्ये नाही तर प्रत्यक्ष विचारलं.
आली का आता पंचाईत, भर दुपारी कसलं ड्रिंक.
मी आपला त्याच्याकडे ठोंब्यासारखा बघत राहिलो, त्याने परत विचारलं
"ऐनी थिंग टू ड्रिंक? आय मीन टी कॉफी"
हात्तिच्या चहा होय, चालेल की
पुढे त्याने विचारलं "व्हॉट नंबर?"
एक समजतंय तर दुसरं कोड असतंच पुढे.
शेवटी माझा मित्र मदतीला धावुन आला.
आणि आम्ही तिघे चहाच्या व्हेंडिंग मशीन जवळ आलो. तिथे समजलं कि आपला ड्रिंक चा नंबर टाकायचा आणि त्याप्रमाणे तुमची चहा/कॉफी तयार होऊन बाहेर येते.
पहिल्यांदा करत असाल तर तुम्हाला पाहिजे ते सेट करा म्हणजे किती साखर, किती दूध, किती स्ट्रॉंग आणि मग त्याचा नंबर दिसतो. तो लक्षात ठेवला कि पुढच्या वेळी तसाच चहा बाहेर.
चला चहाचा प्रश्न पण सुटला कारण स्टेशन वरुन येताना रस्त्यात मला कुठे चहाची टपरी दिसली नव्हती.
आणि आता वाटत होत उगाच चहाची काळजी करत होतो. आपल्याला चहाची देण तर ह्यांचीच आहे म्हणजे हे तर चहा मारत असणारच आणि सोय केलेली तर असेलच.
पुढे लगेचच ४ नंतर ऑफिसमधली गर्दी कमी व्हायला लागली. ४:३० ला तर ऑफिस रिकामंच झालं, माझा मित्र पण माझा निरोप घ्यायला आला आणि बोललं निघ आता. इथे सगळे जण ८ तास पेक्षा जास्त काम करत नाहीत. सकाळी लवकर येणार आणि संध्याकाळी लवकर कल्टी घेणार.
फिटनेस वाले जिम गाठणार, कुटुंब वत्सल आपल्या कुटुंबाला वेळ देतील, पार्टी करणारे एखाद्या पब मध्ये जाऊन बसतील.
मी पण मग निघालो. ऑफिसमधून निघताना त्याच्याकडूनच मी स्टेशनला चालत कस जायचं हे विचारून घेतलं. आता दिवसभारामुळे चांगला हुरुप आला होता. मस्त ऐटीत स्टेशनला जायला निघालो. चालत जाण्याची मजाच वेगळी, सगळं परिसर मस्त जवळुन बघता येतो. रस्त्यात एक छोटा ओढा लागला, त्यात हंस मुक्त विहार करत होते. संध्याकाळची वेळ होती तर काही हौशी तरुण जॉगिंग करत होते. तर ऐन्शीच्या आसपासची वृद्धमंडळी त्याच्या सुसज्ज व्हीलचेयर वरुन फेरफटका मारत होते. रस्ते एकदम मोकळे, कुठे गोंगाट नाही, काही नाही, सगळं शांत शांत.
त्यातच मला आता रस्ता ओलांडायचा होता. समोर मला झेब्रा क्रॉसिंग दिसलं तर विचार केला कशाला आपली भारतीय वृत्ती इथे दाखवा पहिल्याच दिवशी. झेब्रा क्रॉसिंग वरूनच ओलांडू रस्ता. मी एका टोकाला पोहचलो तेव्हा एक गाडी रस्त्यावरून येत होती तर मी थांबलो. त्या गाडीने आपला वेग कमी केला. 
मी आपला मनात "अरे जा कि पटकन, तुझ्यासाठी थांबलोय".
तर ती गाडी चक्क येऊन क्रॉसिंग च्या आधी थांबली. 
मला काही कळेच ना. मी पटकन बघितलं कि सिग्नल तर नाही ना  तर तसं ही काही नाही. 
नंतर धाडकन ट्युब पेटली की हा माझ्यासाठी थांबलाय. तिथे झेब्रा क्रॉसिंगला पादचाऱ्यांना आधी जाऊन देत असतील. मी त्याला धन्यवादचा इशारा करून रस्ता ओलांडला (सकाळ पासून निरीक्षणातुन हे शिकलोकी छोट्या छोट्या गोष्टीला धन्यवाद बोला) त्यानेही माझ्या धन्यवादला मान डोलावली. 
स्टेशनला पोहचलो, आता स्टेशनची पुरेपूर ओळख झाली होती. लगेच ट्रेन पकडली आणि घरी आलो.
पहिला दिवस तरी ह्या विदेशातला मजेत गेला आता ओढ होती ती लंडन फिरायला जायची

Friday, 27 January 2017

मुंबई ते साऊथऍम्पटन - पहिला आंतरराष्ट्रीय प्रवास - २

प्रवासाचा दिवस उजाडला. विमानाची वेळ दुपारी एकची. सकाळी आवरुन झाल्यावर बॅग परत एकदा चेक केली. सगळे महत्त्वाचे फोन नंबर्स हाताशी लागतील असे ठेवले. लंडनला उतरल्यावर पहिल्यांदा प्रणालीला फोन करायचा होता ती साऊथऍम्पटन बस स्टॉपला न्ह्यायला येणार होती. तिचा फोन नंबर सर्वात वर ठेवला. हृदयात आता धडधड वाढली होती. वऱ्हाड निघालाय लंडनमधील एक डायलॉग सारखा मनामध्ये सुरु होता. 'काय होईल! कस्स होईल?' निघताना सगळ्यांचे आशिर्वाद घेऊन सोसायटीतल्या गणपती मंदिरात डोक टेकवलं.  व्यवस्थित ने रे बप्पा!
मुंबईची गर्दी, विमानतळावर जायला जागणारा वेळ ह्याचा अंदाज घेऊन घरातुन सकाळी ९ वाजताच निघालो. रस्त्यामध्ये सुचनांचा पाढा चालु होता.
'रात्रीचा एकटा इकडे तिकडे भटकत बसु नकोस.'
'खाण्यापिण्यावर लक्ष ठेव'
'रोज घरी फोन करत जा'
'बरोबर दिलेले बदाम, काजु खा नाहीतर आणशील तसेच परत'
'फळं खात जा' वगैरे वगैरे
मी सुद्धा निमुटपणे हो हो करत होतो. विमानतळाच्या गेट जवळ गाडी थांबली. गाडीतुन सामान उतरवलं. पप्पा गाडी पार्क करुन येईपर्यंत मी तिथल्या काउंटरवर चौकशी केली. विमानतळाच्या एका टोकाला वेटिंग रुम होती. बॅग्स चेक इन करुन वेटिंग रुम मध्ये थांबुन गप्पा मारत बसता येतील म्हणुन मी आत गेलो आणि मम्मी-पप्पा वेटिंग रुम मध्ये. एका डेस्क वर जाऊन तिकीट दाखवलं, त्यांनी बॅग किती आहेत विचारुन बॅग वजन काट्यावर चढवायला सांगितली. वजन मापात बसलं, त्यांनी बॅगवर लेबल लावुन सरकत्या बेल्ट वर बॅग ढकलली. पासपोर्टला त्यांनी कसली तरी एक पावती लावली आणि बोर्डिंग पास दिला. मी आधीच खिडकीच्या बाजुची जागा मागितली होती. वेटिंग रूम मध्ये गेलो . मम्मी-पप्पा माझी वाट बघतच होते. रूमची दोन भागात विभागणी केली होती. एका बाजुला प्रवासी आणि एका बाजुला प्रवास्यांबरोबर त्यांना सोडायला आलेले व्हिजिटर्स. तिथे जाऊन मम्मी-पप्पांशी बोलत बसलो. पहिला प्रश्न बॅग चेक इन करताना काही त्रास नाही ना झाला. सगळं गेलंना बरोबर. नंतर एक-एक चहा घेतला. चहावाल्याने लगेच हेरलं कि पहिल्यांदा चाललोय. त्याच्याजवळही जास्त गिऱ्हाईक नव्हते. तो आमच्याबरोबर गप्पा मारत बसला. पासपोर्टला लावलेली छोटी पावती बॅगची हे त्याने सांगितलं. जर का लंडनला बॅग नाही भेटली तर ही पावती त्यांना दाखवायची. मग त्याला चहाचे गिऱ्हाईक आले आणि तो निघुन गेला. विमानतळावरच्या टीव्ही स्क्रिन वर लंडनच्या विमानाची स्थिती आता सुरक्षा जांच झाली, शेवटी निघायची वेळ आली. बोलतात ना आपल्या भारतात डोळे ओले केल्याशिवाय निरोप घेऊ शकत नाही तसंच आतापर्यंत मम्मीने थांबुन ठेवलेले अश्रु डोळ्यांतुन वाहु लागले. पप्पांचेही डोळे पाणावलेच. मी कसाबसा स्वतःच्या डोळ्यातलं पाणी लपवुन पुढे निघालो. परत परत मागे वळुन हात हलवुन निरोप घेत घेत पुढे गेलो. शेवटी मी त्यांना आणि ते मला गर्दीत दिसेनासे झाले.
इमिग्रेशनच्या रांगेत लागायच्या आधीच इमिग्रेशनचा फॉर्म भरून घेतला. इमिग्रेशन ऑफिसर कुठे चाललायस? काय काम आहे तिकडे वगैरे प्रश्न. मी आपली उत्तरं दिली. शेवटी त्याने पासपोर्ट वर स्टॅम्प मारला आणि मी पुढे सरकलो. सिक्युरिटी चेक मधुन कॅरी बॅग आणि मी दोघेही क्लिअर झालो आणि विमानाच्या गेट वर येऊन बसलो. अजुन बराच वेळ होता. पप्पाना मोबाईलवर फोन करुन सगळं व्यवस्थित झालं आहे सांगितलं. तेही अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहचले होते.
थोड्यावेळाने सहजच विमानतळावरची दुकाने फिरत बसलो. उगाचच प्रत्येक गोष्टींची किंमत बघुन 'बापरे किती महाग' हे चेहऱ्यावर भाव आणायचो. जस स्वस्त असत तर मी लगेच घेणारच होतो. ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये वीस रुपयात मिळणारं सॅन्डविच कुठे आणि इथे १८० रुपयाचं कुठे. मी बॅग मधुन आणलेली बिस्कीट खाऊन पोटाला शांत केला. तस पण विमानात तर जेवण भेटणार होतच.
विमानाची वेळ होत आलेली. गेटवर हवाईसुंदरींची चहलपहल सुरु झाली आणि नंतर त्यातल्या एकीने माईक वर बोर्डिंग सुरु केल्याची घोषणा केली. आम्ही सगळे लाईनने आत जाऊ लागलो. बोर्डिंग पास आणि पासपोर्ट वर नजर टाकुन मला आत सोडल. विमानाच्या दारात गेल्यावर परत एकदा एकीने स्वागत करताना बोर्डिंग पास बघुन , मला माझ्या सीट पर्यंत कस जायच सांगितलं. मी आपल्या सीट पर्यंत पोहचलो आणि बसताच क्षणी माज्या लक्षात आलं माझं जॅकेट कुठंय, हातातच तर होतं, कुठे गेलं? आणि मी तसाच परत मागे गेलो. त्यात माझं एक वळण चुकलं आणि भलतीकडेच कुठेतरी गेलो. माझ्या मागे लगेच एक कर्मचारी आली तिचे चेहऱ्यावरचे हावभाव बघुन नक्कीच तिने मला दहशतवादी तर नाही समजलं असणार. तिने काय झालं विचारलं. मी सांगितलं माझा जॅकेट कुठे तरी पडलं, ती दरवाज्यात घेऊन गेली. तिथे आधीच त्यांनी एका बाजुला उचलुन ठेवलेल. मी ते घेऊन परत माझ्या जागेवर जाऊन बसलो. नंतर झालेला प्रकार आठवुन स्वतःच हसत बसलो.
थोड्यावेळाने बोर्डिंग पुर्ण झाल्यावर सुरक्षा सुचना दिल्या गेल्या. सगळ्यांनी सिटबेल्ट्स लावले आहेत की नाही हे तपासुन क्रु मेंबर आपल्या जागेवर बसले. कॅप्टन ने 'वी आर रेडी फॉर टेक ऑफ' ची सुचना देऊन विमान धावपट्टी वर आणलं. अचानक एखाद्याने पुढे जोरात खेचल्यासारखा आभास झाला. विमानाने वेग धरला होता आणि क्षणार्धात ते हवेत झेपावलं. खिडकीतुन बाहेर मुंबई बघु लागलो. पण काही समजायच्या आतच विमान अरबी समुद्रावर आलं. जुहु चौपाटी फक्त ओळखता आली. पाठीमागे मुंबई दुर जाऊ लागली. पाच मिनिटांनी तर खाली सगळं पाणीच पाणी. विमान उंचीवर स्थिर झाल्यावर सीट बेल्ट्सची साइन बंद झाली. मी विमानातून खाली बघण्यात गुंग होतो. पण १०-१५ मिनिटांनी त्याचाही कंटाळा आला. काय फक्त पाणी बघायच. समोरच्या स्क्रीनवर काही बघण्यासारख आहे का ते शोधुन त्यातला एक सिनेमा चालु केला. क्रु मेंबर्सनी सगळ्यांना जेवण द्यायला सुरुवात केली. एका ट्रॉलीमधुन प्रत्येकाला छोट्याश्या जेवणाच्या प्लेट देत ती ट्रॉली पुढे सरकत होती. खाऊन झाल्यावर मी परत सिनेमा बघायला लागलो. मध्ये मध्ये खाली काही नवीन दिसत आहे का तेही बघत होतो. स्क्रिन वर नकाशा हि होता ज्यात विमानाची सध्याची स्थिती, लंडन पासुनचे अंतर दिसत होते. थोड्याच वेळात विमान अरबी समुद्रावरून जमिनीवर येणार होत. ते अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान ते माहित नाही पण उत्सुकतेपोटी मी खाली बघत होती. पाणी संपुन जमीन सुरु झाली. पण सगळं उजाड दिसत होतं. लांब लांब कुठेही ना रस्ता दिसत होता ना कुठलं गाव. तेवढ्यात विमानाच्या लाईट्स बंद केल्या गेल्या. क्रु मेंबर्सने सगळ्यांना खिडक्यांचे फ्लॅप्स बंद करायला सांगितले. विमानात आता बऱ्यापैकी अंधार झाला होता. बरेच जण झोपी गेले. मी स्क्रीन वर मधे नकाशा मधेच सिनेमा करत वेळ मारू लागलो.
नकाशात जवळपास कुठलं शहर दिसलं तर फ्लॅप्स थोडे वर करून खाली दिसतंय का ह्याचा प्रयत्न करायचो. थोड्या वेळाने मी सुद्धा एक डुलकी काढली. ५-६ तास गेल्यावर विमान आता युरोपवर आल्याचं नकाशातून दिसत होत. खाली बघितलं तर सगळे ढग. त्या व्यतिरिक्त काहीच दिसत नव्हतं. मग पुन्हा स्क्रीन मध्ये डोळे घातले. जर्मनीच्या वर आलो असु तेव्हा विमानाच्या लाईट्स लागल्या. क्रु मेंबर्स परत आपल्या ट्रॉलीज घेऊन पॅसेज मधुन सरकु लागले. टी ऑर कॉफी सगळ्यांना विचारून त्याच्या बरोबर स्नॅक्स द्यायचा काम चालु होत. चहा पिल्यानंतर थोडासा फ्रेश झालो. तेवढ्यात कॅप्टनची अनाऊन्समेंट झाली, १ तासात आपण पोहोचु. फ्लॅप्स वर केले पण ढगांची गर्दी अजुनही होतीच. सिटबेल्ट्सची साइन चालु झाली. विमानाची जमिनीपासुनची उंची हळुहळु घटु लागली.  ज्या लोकांच लंडन हे प्रवासाचं शेवटचं ठिकाण आहे त्यांना युके इमिग्रेशन फॉर्म दिले आणि ज्यांना लंडनच्या पुढे प्रवास करायचा आहे त्यांना माईक वरून सुचना देण्यात येत होत्या. मी फॉर्म भरून टाकला. नकाशात दिसत होत कि आता विमान इंग्लिश खाडी वर आहे पण खिडकीतून खाली ढगच होते. इंग्लिश खाडी मागे टाकून युकेच्या जमिनीवर विमान आल. क्रु मेंबर्सनी शेवटची एक फेरी मारून सगळ्यांची सिटबेल्ट्स चेक केले आणि आपापल्या जागेवर गेले. विमानाची जमिनीपासून उंची कमीकमी होऊ लागली. विमान ढगांमध्ये घुसल. आजुबाजुला सगळा धुकं दिसत होत. अजुन विमान खाली आल्यावर पहिल्यांदा युकेची जमीन दिसली. पण विमान इतक्या खाली आलं होत कि लंडनचा नजरा वरून बघता आला नाही. विमानाने अलगद आपले चाक धावपट्टीवर टेकवले आणि वेग एकदम कमी केला. विमान आपल्या गेटवर आलं. चला, विमानप्रवास तर उत्तम झाला.
विमानातुन बाहेर आल्यावर, आता काय? मी सगळे विमानातुन बाहेर पडलेले ज्या दिशेने जात होते त्या दिशेने चालत राहिलो. पुढे इमिग्रेशनच्या काउंटर वर लाईन लावली. पासपोर्ट, इमिग्रेशन फॉर्म आणि सगळी कागदपत्रे हातातच ठेवली. नंबर आल्यावर त्याने माझा पासपोर्ट मागितला आणि माझ्याकडे एक नजर टाकून "व्हाय यु हॅव कम टु युके?" मी उत्तर दिल. त्याने पासपोर्ट वर स्टॅम्प मारला पण मला एका मेडिकल रुम मध्ये जायला सांगितलं. तिकडे गेल्यावर एकीने मला काहीतरी विचारल जे मला काहीच समजलं नाही. हा माझा मुख्य त्रास होता आणि मला ह्याचीच भीती वाटत होती. त्यांचे उच्चार नाही समजलं तर काय.  तिने माझा पासपोर्ट घेतला आणि काहीतरी कॅम्पुटरवर नोंद केली आणि मला जायला सांगितलं. आता नक्की माहीत नाही कि तिला जे पाहिजे होतं ते भेटलं की नाही. पुढे मी बॅगेज क्लेमच्या दिशेने गेलो. तिथे बॅग यायची वाट बघत बसलो. मला तर वाटत की स्वतःच्या सहनशीलतेची कसोटी पाहणारा हा वेळ असतो. आपल्या समोर सगळ्यांच्या बॅग्स येत असतात. सगळे आपापली बॅग घेऊन जात असतात आणि आपल्या बॅगचा काही पत्ता नसतो. ह्या वेळी सगळे विचार येऊन जातात. आपली बॅग ह्यांनी भारतातच तर नाही ना सोडली. आपल्या बॅगला ह्यांनी काही केलं तर नसेल ना. भलतीकडेच तर पाठवली नाही ना. हा सगळं विचार चालु असताना शेवटी बॅग येते आणि आपण सुटकेचा निःश्वास टाकतो.
बॅग घेऊन बाहेर पडताना गेटवर दोन सुरक्षा रक्षक दोन भले मोठे कुत्रे घेऊन उभे होते. त्यांना बघुनच भीतीने गाळण उडत होती. ते दोन्ही कुत्रे बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या बॅगचा वास घेत होते. मी विचार केला माझ्या बॅग मध्ये तर बरंच काही आहे. लोणचं, बिस्किटे, लाडु... जर ह्यांच्यापैकी कुठल्या वासामुळे हा भुकायला लागला तर. पण त्याने मला जाऊ दिल. आता बस स्टेशनच्या दिशेला कुठला रस्ता जातो हे कुठं सांगितलंय का ह्याचा बोर्ड शोधायला लागलो. ट्रेन स्टेशन, टॅक्सी स्टॅन्ड, पीक अप पॉंईंट असे सगळे बोर्ड दिसले पण बस स्टेशन नाही. बसचे चित्र असलेला पण त्यावर कोच स्टेशन लिहिलेली पाटी दिसली पण मला जे पाहिजे ते आणि कोच स्टेशन एकच की वेगवेगळे? शेवटी तिथे उभा असलेल्या सुरक्षा रक्षकाला विचारलं. अनोळखी व्यक्तींना विचारण्यापेक्षा ह्याला विचारणं जरा जास्त भरवस्याच वाटलं. त्याला सांगितलं, मला नॅशनल एक्स्प्रेस बस पकडायची आहे , कस जायच? त्याने व्यवस्थित समजावुन सांगितलं. त्याचे उच्चार समजले ही एक मोठी गोष्ट. शेवटी कोच स्टेशन म्हणजेच बस स्टेशन ह्याचा उलगडा झाला. विमानतळावरून ट्रेन/बस स्टेशन आणि बाकीचे टर्मिनल्स अंडरग्राउंड रस्त्याने जोडले आहेत. जवळ्पास १५ मिनिटे चालल्यावर बस स्टेशनला पोहचलो. तिथे तिकीट काउंटरवर जाऊन तिकीट घेतली. तिने मला सुट्टे पैसे दिले. त्यात एक आपल्या जुन्या पाच रुपये सारखा कॉइन होता. आपल्या सारखे स्पष्ट दिसतील असे नंबर त्या वर नव्हते.  तिला विचारला "इज धिस ५ पाउंड?" ती बोलली, "नो इट्स १ पाउंड." अरे बापरे! नंतर बारकाईने पाहिल्यावर छोट्याश्या अक्षरात वन पाउंड लिहिलेल दिसल. बसला अजुन दीड तास होता. तिथे एका पब्लिक फोन वरून प्रणालीला फोन करायचा प्रयत्न केला पण मला काही जमलं नाही. शेवटी त्या दुकानदारालाच विचारल, फोन कसा ऑपरेट करायचा. त्याने नंबर लावुन दिला. प्रणालीला सांगितलं, एअरपोर्टला पोहचलोय आणि बसची वेळ सांगितली. तिने मस्त झोपुन यायला सांगितलं. लास्ट स्टॉप आहे. त्यानंतर थोडासा फ्रेश झालो. बॅग मध्ये ठेपले होते त्यातला एक मटकावला. मघाशी मिळालेले सुट्टे पैसे परत बघितले आणि कुठल नाणं कितीचं समजुन घेतलं. बाहेर थंडी जाणवत होती. कबुतरांचा सर्वत्र वावर होता. एकदम बिनधास्तपणे माणसांच्या एकदम जवळ जाऊन खाली पडलेले अन्न टिपत होते. बरेच लोक आपापल्या बसची वाट बघत बसले होते. कोणी पेपर वाचण्यात गुंग तर कोणी पुस्तक. काही लोक डाराडुर झोपले होते. समोरच्या टीव्ही स्क्रिनवर वेळापत्रक आणि कुठल्या फलाटावर बस लागणार आहे ते बघायची सोय होती. त्यामुळे मी निवांत होतो.
स्क्रिन वरून एक एक करून आधीच्या बसेस गायब होत होत्या. माझ्या बसला १० मिनिटे राहिली तेव्हा मी सावरून बसलो कारण आता कधीही बोर्डिंग सुरु होईल. पण ७ वाजले तरीही काहीही हालचाल नाही. मनात शंका आली म्हणुन लगेच काउंटरवर जाऊन विचारलं तर तिथला बोलला ७ तर वजुन गेले, बस गेली असेल. मी बोललो शक्यच नाही मी लक्ष देत होतो आणि तेवढ्यात बोर्डिंगची अनाऊन्समेंट झाली. तो बोलला मग उशीर झाला असेल बसला. मी लगेच फलाटावर गेलो. तिथे माझी बॅग बस मध्ये ठेवली आणि सीट वर जाऊन बसलो. बस मध्ये बसल्यावर ड्राइव्हरने पण सेफ्टी अनाऊन्समेंट केली आणि सीटबेल्ट लावुन बसायला सांगितलं. इथे बसच्या प्रत्येक सीटला सीटबेल्ट असतो आणि तो लावुन बसावा लागतो. आपल्या कडे तर ड्राइव्हर पण कधी लावत नाही.
एक चांगली गोष्ट म्हणजे ७ वाजले तरी उजेड होता. दोन तासांनी बसने पहिला स्टॉप घेतला. पुढच्या स्टॉपचा नाव त्याने पुकारलं साऊथऍम्पटन युनिव्हर्सिटी. आता आली का पंचायत परत, मी गोंधळलो. हाच तर आपला स्टॉप नाही ना. पण बरीच लोक बसुन होती आणि प्रणाली पण बोलली होती शेवटचा स्टॉप आहे बसचा. पण ड्राइव्हर तर साऊथऍम्पटन बोलला. समोरच्या सीट वर एक मध्यमवयीन जोडपं होत त्यांना विचारला तर त्यांनी माझा गोंधळ दुर केला. हा स्टॉप साऊथऍम्पटन युनिव्हर्सिटी आहे, पुढचा स्टॉप साऊथऍम्पटन. मी शांत झालो. तरीही मनात शंकांच काहुर माजलं होत. प्रणाली आली असेल ना घ्यायला. ती नसेल तर काय करायचं, मोबाईल फोन आहे पण तोही बंद कारण सिम कार्ड भारताचं जे इकडे चालणार नाही.  आता १० वाजत आले होते. अंधार पडला होता. रस्त्यावर तर शुकशुकाट दिसत होता. टॅक्सी तरी असतील का जायला. त्यातच बसच्या लाईट्स लागल्या आणि ड्राइव्हर ने साऊथऍम्पटन आल्याचं सांगितलं. बस डेपोमध्ये जात असतानाच प्रणाली बाहेर उभी असलेली दिसली आणि जिवात जीव आला. बाहेर येऊन पहिल्यांदा तिला भेटलो. जवळपास १४ तासांनी कुणातरी ओळखीच्या व्यक्तीला भेटलो होतो. बॅग बसमधुन घेतली आणि प्रणालीने आधीच बुक करून ठेवलेल्या टॅक्सीने घरी आलो. घरी आधीच जेवण करून ठेवलं होत. ओव्हन मध्ये गरम करून मस्तपैकी ताव मारला. ती जर तिथे नसती तर रात्री काय हालत झाली असती ह्याची कल्पना हि करवत नाही.
शेवटी साडेअकरा वाजता बिछान्यावर पडलो. आतापर्यंतचा पुर्ण प्रवास डोळ्यासमोरून सरसर जात होता आणि त्यातच कधी झोप लागली कळलं नाही.

मयुरेश मांजरे
+९१ ९८६९७५६३३०


कृपया उजवीकडील फॉलो बटन क्लिक करा.
आपला अभिप्राय नक्की खाली नोंदवा. 
आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. 

Thursday, 19 January 2017

मुंबई ते साऊथऍम्पटन - पहिला आंतरराष्ट्रीय प्रवास

"पहली बार एक हि बार आता है और पहेला अनुभव बहोत स्पेशल होता है।" इंग्लिश विंग्लिश सिनेमातील हे अमिताभचे संवाद ऐकुन मला माझ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाची आठवण झाली. नवीन देशात  पहिल्यांदा एकट्याने प्रवास करायचा, तर एक अनामिक भिती, उत्सुकता सगळंच अनुभवलं होत.
नेहमीप्रमाणे ऑफिसचा दिवस सुरु होता. फक्त दिवस वेगळा पण वेळापत्रक तेच. फेसबुक, ट्विटर वर ज्यांनी कोणी पोस्ट बनवले आहेत रोज नवीन येणारा दिवस नवीन संधी घेऊन येत असतो त्यांना खरंच भेटुन विचारावा वाटतं.
दुपारी जेवून झाल्यावर पेंगुळलेल्या अवस्थेत काम करायचा सगळे आटोकाट प्रयत्न करत असतात. अश्याच एका दुपारी मी माझ्या कम्प्युटर समोर बसुन काहीतरी करत होतो. शुभ, माझा मॅनेजर कुठ्ल्यास्या मिटिंग मधून बाहेर आला आणि त्याच्या नेहमीच्या खास अंदाजात "अमित, मुझे एक बंधा चहिये, जिसको मेटलाईफ आता है।". अमित माझा लीड होता. दोन-तीन आठवड्यापुर्वीच त्याने माझी मेटलाईफ वर ट्रेनिंग सुरु केली होती. त्याने लगेच माझ नाव सांगितलं आणि मी चमकलो. शुभ अमितला मिटिंग रुम मध्ये घेऊन गेला आणि १०-१५ मिनिटे त्यांची काहीतरी चर्चा सुरु होती. अर्थातच मला अंदाज आला ही चर्चा माझ्याबाबतीतच सुरु आहे कारण माझं  नाव आल्यावरच ते मिटिंग रुम मध्ये गेले.
मिटिंग रुम मधुन बाहेर आल्यावर अमित डायरेक्ट माझ्याकडे आला
"युकेला जाशील काय?"
काय? खरंच? मी बरोबर ऐकलं ना? ५-१० सेकंड पॉझ. 
"हो" मी मागचा पुढचा विचार न करता बोललो. ह्या कंपनीत येऊन जेमतेम साडेचार महिनेच झाले होते. साडेचार महिन्यात माझ्या समोर ४-५ जण युकेला गेले होते. अजुन एक जायच्या तयारीत होता आणि ऑफिस मध्ये ४० जण, त्यातले बरेच आधीच जाऊन आले होते. त्यामुळे नाही म्हंटल तरी मनात येतच होत कि आपला नंबर कधी लागेल पण इतक्या लवकर लागेल अस वाटलं नव्हतं .
"ठीक आहे मग, अजुन बोलु नकोस कोणाला. मी सांगतो नंतर नक्की झालं की"
"किती महिने असेल?"
"३-४ महिने असेल"
"ठीक आहे"
अमित परत शुभ कडे निघून गेला. पण हे सगळं फ्लोअरवरच सगळ्यांसमोर झालं होत. सगळ्यांनाच अंदाज आला होता कि काय चालु आहे.
त्या दिवशी रात्री घरी गेल्यावर मम्मी- पप्पाना सांगितलं. कदाचित तीन महिन्यासाठी युकेला पाठवतेय कंपनी. ते ऐकुनच मम्मीच्या मनात धस्स. एकुलता एक मुलगा आणि ते पण इतक्या लांब, पहिल्यांदा. मागे ७ दिवसांसाठी हिमालय ट्रेकिंगला गेलो होतो पण ओळखीचा ग्रुप होता बरोबर. तेवढाच काय तो घरापासुन लांब होतो आणि आता तर चक्क सातासमुद्रापार एकट्याने. पण दोघांचा पाठिंबा होता.
ऑफिसमध्ये काही दिवस असेच गेले. मधेच एके दिवशी शुभ डेस्कजवळ आला
"तेरा अभी तक छह महिना पुरा नही हुआ है तो तुझे शायद नही भेज शकते, किसीने बताया क्या तुझे?".
"नही"
"ठीक है, बात करते है बादमे।" बोलुन  निघुन गेला. माझा तर सगळा मुडच निघुन गेला.
पुढे १५ दिवसांनी तर मी ज्या प्रोजेक्ट वर काम करत होतो तोच बंद झाला आणि प्रोजेक्ट टीम मधल्या प्रत्येकाला दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये हलवलं पण मी एकटाच बिना प्रोजेक्टचा. एकतर तो २००८ च्या मंदीचा काळ आणि ऑफिस मध्ये काहीही काम नाही. युकेची स्वप्न तर सोडाच, आहे तो जॉब ही जायचा. आधीच्या कंपनीतुन सुद्धा मंदीमुळेच बाहेर पडलो होतो. ह्या भीतीने अमितला विचारलं काय चालु आहे. माझ्याकडे काही काम नाही.
"अरे, तुझ युकेच चालु आहे ना"
"पण ते तर कॅन्सल झाल ना"
"नाही नाही, तुलाच पाठवणार आहोत"
"तो प्रोजेक्ट तर बंद झाला"
"तुला ज्या मोड्युल साठी पाठवत आहोत तो चालु आहे अजून. त्यात काम येणार आहे"
"कधी पर्यंत नक्की होईल?"
"तुझे ६ महिने कंपनीत पुर्ण होतील त्याच दिवशी व्हिसा प्रोसेसिंगला पाठवणार आहोत."
परत चेहऱ्यावर हुरुप.
अमितने ह्यावेळी सगळं समजावुन सांगितलं. माझं ऑफिस सॉल्सबरी शहरात असणार आहे. ३ महिन्यापूर्वी गेलेला वल्लभसुद्धा त्याच ऑफीसमध्ये आहे. त्याच्याशी माझं नेहमी प्रोजेक्टच्या कामानिमित्त बोलणं होत असत. चला म्हणजे कोणीतरी ओळखीचं बरोबर असेल. हे एकूण बरं वाटलं.
संध्याकाळी वल्लभशी पण बोलणं झालं. त्यालाही माहीत होतं मी तिकडे जाणार आहे. त्याने तिकडची थोडी कल्पना दिली. तो साऊथऍम्पटनला कंपनीच्या गेस्ट हाऊस मध्ये राहतो आणि तिथुन रोज ट्रेनने सॉल्सबरीला जातो. प्रणाली, अजुन एक ऑफिस मधली मुलगी साऊथऍम्पटनलाच राहत होती. प्रणालीशीही माझी थोडीफार ओळख होती. 
थोडे दिवस असेच गेले. एव्हाना मी युकेला जाणार आहे हे ओपन सिक्रेट सगळ्यांना माहित झालं होत. सगळ्यांनी मला हळुहळु विचारायला सुरुवात केलं.
"कब जा रहा है?
"अरे! कुछ भरोसा मत कर जब तक प्लेन में ना बैठ जाये।"
हे सगळं चालु असताना मला आमच्या युकेच्या लंडन ऑफिसमधुन इमेल आला. त्यात कसलासा वर्कपर्मिट नंबर होता. तो व्हिसा प्रोसेसिंगला लागेल.
मला मुख्य टेन्शन होतं ते व्हिसा प्रोसेसिंगचा. व्हिसा मुलाखतीत काय विचारतात? मुलाखत क्लिअर होईल का? अमेरिकन व्हिसा प्रोसेस कडक असते आणि ते मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारतात हे मला माझ्या आधीच्या कंपनीमुळे माहीत होत. तिकडे माझ्या समोर मुलाखतीला गेलेल्या २-३ जणांना व्हिसा नाकारला होता. मी अंदाज बांधला युकेचा पण तसच काहीतरी असेल आणि त्याच विचारांनी मला टेन्शन आलेलं.
व्हिसा मुलाखतीची तारीख आली. आदल्या दिवशी अमितला जाऊन विचारलं मुलाखतीसाठी काय तयारी करायची. तो बोलला "कसली मुलाखत, वर्कपरमिट आहे ना, फक्त बायोमेट्रिक असतं." मला त्यावेळी बायोमेट्रिक म्हणजे काय हे ही माहित नव्हतं.
व्हिसा ऑफिसला दिलेल्या वेळेच्या १५ मिनिटे आधी आत सोडलं.  आतमध्ये बघतो तर विचार केला त्यापेक्षा सगळ उलट. मला वाटल होत काउंटरच्या पलीकडे इंग्लिश बाबु असतील तर इथे सगळे देशी जनताच. एका काउंटर वर माझी सगळी कागदपत्रं तपासली आणि जमा करून घेतली. मग पुढच्या काउंटर वर पाठवलं. तिथे एका कम्पुटर वर कॅमेरा आणि समोर स्कॅनिंग मशीन होती. तिथे माझा फोटो काढला आणि फिंगरप्रिंट्स स्कॅन केले. बस एवढंच. जेमतेम २०-२५ मिनिटात काम झालं. हे तर खुप सोपं आहे. उगाच टेन्शन मध्ये होतो.
आता फक्त वेट अँड वॉच. १ आठवडा झाला, २ झाले तरी काही नाही.
ह्यावेळेत मम्मी-पप्पानी गावी जाऊन यायचा बेत आखला. त्यावेळी कोणाचं तरी नात्यात लग्न ही होत.  जायच्या आधी गावी सगळ्यांशी भेट होईल आणि कुलदैवत निमगावच्या खंडोबाचं दर्शनही होईल. काकांना मी बाहेरगावी जाणार हे कळताच अभिमानाने लग्नाच्या मंडपातच जो समोर येईल त्यांना सांगु लागले.  काहींनी तर मम्मीला "एकुलत्या एक मुलाला कस गं एवढ्या लांब पाठवतेस?"

परत आल्यावर मी ऑफिस मध्ये आधी युकेला जाऊन आलेल्याना त्रास देऊ लागलो. तुमचा व्हिसा किती दिवसात आला होता.
प्रत्येकाचं वेगवेगळ उत्तर
"मेरा तो एक हप्ते में आ गया था"
" सब डॉक्युमेंट बराबर दिया था ना, अगर कुछ छुट गया होगा तो व्हेरीफिकेशन के लिये टाइम लगता है।"
"अरे आता सुट्टीचा सीजन आहे म्हणुन वेळ लागत असेल"
शेवटी ३ आठवडे झाल्यावर व्हिसा स्टँम्पड पासपोर्ट माझ्या हातात आला. अमित आणि शुभने तर लगेच ३ दिवसानंतरची तिकीट बुक करायचं ठरवलं. मी बोललो काहीच तयारी नाही आहे. पॅकिंग करायला किती वेळ लागतो. तर त्यांचं उत्तर, "आधीच उशीर झालाय अजुन नाही करु शकत."
बापरे! व्हिसा आल्यावर एवढ्या लवकर चक्र फिरतील असा विचारही मी केला नव्हता. माझा अंदाज होता व्हिसा आल्यावर १०-१२ दिवसांनी जावं लागेल पण हे तर लगेच ३ दिवसांनी. दुसरा बॉम्ब हा फुटला माझ्यावर कि मी जेव्हा युकेला पोहचणार त्यावेळी वल्लभ सुट्टीसाठी भारतात येणार आहे.  म्हणजे तिकडच्या ऑफीसमध्येही कुणी ओळखीच नसणार. बघु आता काय होत ते.
युकेच्या ऑफिसमधुन ईमेल आला, कंपनीच्या गेस्ट हाऊस मध्ये राहणार आहे की स्वतः बघणार आहे. पहिलीच वेळ आहे, आपली कंपनीची गेस्ट हाऊसच बरी. सॉल्सबरीला जरी ऑफिस असलं तरी गेस्ट हाऊस मी साऊथऍम्पटन मध्येच मागितलं. तेवढीच वल्लभ आणि प्रणालीची सोबत होईल. 
ऑफिस मध्ये मित्रांनी सल्ले द्यायला सुरुवात केली. एकाने "अभी तो वहा गर्मी होगी, जॅकेट कि जरुरत नही होगी. उधर ही जाके ले लेना, सस्ता भी होगा।" ह्या उलट वल्लभ, "उतरल्या उतरल्या थंडी लागेल खुप मग काय करशील, जॅकेट घेऊन ये." 

त्यादिवशी घरी तर सावळा गोंधळच. बॅगपासुन सगळीच तयारी करायची होती. एक तर जवळच्या माहितीतलं  कोणी नव्हत की ज्याने परदेशवारी केली आहे. त्यामुळे घरी हा अनुभव नवीन होता. काय काय न्ह्यायचं ह्याची जमेल तशी लिस्ट बनवली. यादीत सर्वात आधी भांडी आली. भारतीय परदेशात जाताना भांडी बरोबर नेतातच कारण भारतीयांचे पदार्थ बनवायला भारतीय भांडीच पाहिजेत असा समज. त्यात सर्वात आघाडीवर होत ते कुकर. ऑफीसमध्ये ही सगळ्यांनी कुकर घेऊनच जा सांगितलेलं. त्यानंतर 'उल्हातन' कारण तिकडे चपात्या कोणी बनवत नाही मग उल्हातन कुठून भेटणार. तव्यासाठी आम्ही विचार केला कि तिकडे ऑम्लेट तर बनतोच म्हणजे तवा भेटेल. अजुन बऱ्याच भांड्यांवर चर्चा केली पण एवढ्यावरच यादी संपवली. आम्हाला जे गेस्ट हाऊस देतात ते पुर्ण फ़र्निशड असणार होत आणि त्यात सगळ्या दैनंदिन वापरातल्या घरातल्या सर्व गोष्टी असणार होत्या. भांडी झाल्यानंतर खाण्याचे पदार्थ. मॅगी, तांदूळ, चहा पावडर, साखर, मसाले, लोणच....... आणि हि यादी वाढतच गेली. तिकडे भारतीय दुकाने असतात ज्यात हे सगळं मिळत पण विमानातुन उतरल्या उतरल्या काय शॉपिंगला जाणार आहेस का? पहिल्या दोन आठवड्याचं सामान तरी राहुदे. त्यानंतर कपडे, इतर सामान करत करत यादी एकदाची तयार झाली.

दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला आणि मम्मी-पप्पायादीतील सामान खरेदीला. ऑफिसमध्ये कुठल्या वेळेचं विमान घ्यायचं ह्याच्यावरुन खलबत सुरु होती. दुपारच्या विमानाची तिकीट कंपनीच्या दृष्टीने फायदेशीर होती जी लंडनला ५ वाजता पोहचणार होती. तिथुन मला साऊथऍम्पटनला जायच होत, जे विमानतळावरुन ३ तासावर. म्हणजे जाईपर्यंत रात्रीचे १० वाजले असते. मी थोडासा चेहरा पडला. शुभने लगेच हेरलं, "तुझे कोई खा नाही जायेगा रात के १० बजे, इधर १२-१२ बजे तक घुमता है ना।". ह्याच्यावर मी पुढे काही बोललो नाही. तेच तिकीट कन्फर्म झालं.
विमानतळावरुन साऊथऍम्पटनला कसं जायचं ह्याच्यासाठी शेफाली मदतीला धावुन आली. शेफाली ऑफीसमध्ये नवीनच आलेली. ती मुख्य म्हणजे एचआर आणि ऍडमिनची कामं बघायची. माझं तिकीट, फॉरेक्स ह्याची सगळी जबाबदारी तिच्यावरच होती आणि ती सुद्धा हे सर्व पहिल्यांदाच करत होती. तिने अस्मिताला फोन लावुन विमानतळ ते साऊथऍम्पटन प्रवासाची माहिती विचारली. अस्मितापण नुकतीच कंपनीतर्फे युकेला गेली होती.  विमानतळावरुन नॅशनल एक्स्प्रेस बस तिने घ्यायला सांगितली. वेळापत्रक वेबसाईट वर आहेच. आम्ही दोघांनी वेळापत्रक बघितलं आणि कुठली बस भेटेल ह्याचा अंदाज घेतला. 

मम्मी-पप्पानी घरी सगळी शॉपिंग करून ठेवली होती. आता बॅग मध्ये सामान लावणं सुरु होतं. एवढी यादी बनवली असतानाही ऐनवेळी काहीतरी आठवायचं आणि मग ते सुद्धा टाकायची घाई. बॅग आता बऱ्यापैकी पॅक झाली.

ऑफिसमध्ये शेवटच्या दिवशी आमच्या डिपार्टमेंटचे हेड अनिल जोशींनी मला विचारलं, "ह्या आधी कधी विमानाने प्रवास केला आहेस का?"
"एवढ्या लांब नाही, लहानपणी औरंगाबादला गेलो होतो एकदा"
ते मला मिटिंग रूम मध्ये घेऊन गेले. विमानतळावर गेल्यापासुन ते तिकडे विमानतळावरुन बाहेर येईपर्यंतची पुर्ण प्रोसेस सविस्तर समजावुन सांगितली. कुठे बॅग चेकइन करायची, कुठे सिक्युरिटी चेक, विमानात ९ तास कसे घालवायचे इथपासुन ते विमानातुन उतरल्यावर इमिग्रेशन, बॅगेज क्लेम सगळं सगळं. त्यानंतर मला तिकडे किती पगार असेल, त्याचं नियोजन कसं करायच तेही. गेस्ट हाऊसच भाडं अमुक अमुक जाईल, मग ट्रेनचा पास, खाण्या-पिण्याचे एवढे जातील मग एवढे शिल्लक राहतील. त्यांनी आणखी एक गोष्ट बजावली ती म्हणजे तिकडे खर्च करताना भारतीयांच्या डोक्यात कॅलक्युलेटर चालु असतो. १ पौंड = ७० रुपये तो बंद ठेवायचा प्रयत्न कर. हे सगळं ऐकुन थोडा धीर आला.
वल्लभने ही मला फोन करून ऑफिस मध्ये पहिल्या दिवशी कोणाला भेटायचं आणि साऊथऍम्पटनवरुन सॉल्सबरीला जाण्यासाठी कुठली ट्रेन घ्यायची ह्याची सगळी माहिती दिली. त्याने एक सविस्तर इमेल सुद्धा पाठवला ज्यात हि सगळी माहिती त्याने टाईप केली होती. 
फॉरेक्स, तिकीट, कंपनी लेटर सगळं पुन्हा पुन्हा निघायच्या आधी बरोबर घेतलंय ह्याची खात्री केली. सर्वांना एकदा भेटुन घेतलं आणि ऑफिस सोडलं.
घरी पण सर्व तयारी अंतिम टप्प्यात होती. बॅगवर पुन्हा एकदा नजर टाकली. प्रवासात लागणारी कागदपत्रे हाताशी असतील अशी ठेवली. झालं आता उद्या पहिल्यांदा विमानाने राणीच्या देशात.

क्रमशः

मयुरेश मांजरे
+ ९१ ९८६९७५६३३०

कृपया उजवीकडील फॉलो बटन क्लिक करा.
आपला अभिप्राय  खाली नोंदवा. 

Wednesday, 14 December 2016

अलिबाग - बेबीमुन

बेबीमुन, अलीकडेच ह्याची चर्चा जास्त सुरु झाली आहे. लग्नानंतर जोडपं हनिमुनला जातात तस आता तुमच्याकडे गुडन्युज असल्यावर बाळ व्ह्यायच्याआधी जोडप्याने एकत्र फिरायला जाणं.  एक छानशी सुट्टी फक्त दोघांनीच एकत्र घालवायची. मी ही संकल्पना कुठेतरी पेपरात वाचली तेव्हा आम्हीही गरोदरच होतो (आम्ही म्हणजे अर्थात माझी बायको :) ). मला ही कल्पना आवडली आणि मी सुद्धा जवळपासची बेबीमुनसाठी डेस्टिनेशन्स शोधु लागलो. त्यातच आमचा लग्नाचा वाढदिवसही जवळच होता. मग दोन्ही गोष्टी एकत्रच होतील. घरच्यांनाही कल्पना आवडली. तेवढाच रोजच्या गोष्टीतून बदल आणि तरतरीत सुद्धा वाटेल. पण रिस्क नको म्हणून जवळच डेस्टिनेशन ठरवायचं विचार झाला.
मुंबईच्या जवळपास, सोपं आणि उत्तम म्हणजे 'अलिबाग'. मला अलिबागला जाऊन बरेच वर्ष झाली होती आणि मंजुश्रीही इतक्यात तिथे गेली नव्हती. मग ठरलं तर - अलिबाग. मित्रांजवळ तिथल्या हॉटेल्सची चौकशी सुरु केली. तीन-चार नावे भेटली त्यातलंच एक पसंत केलं. इंटरनेटवरून त्या हॉटेलची माहिती भेटली. प्रतिक्रया पण छान होत्या. मग लगेच फोन लावुन बुकिंग कन्फर्म केली. शनिवार ते सोमवार असे ३ दिवस आरामात घालवायचे.
पण शनिवारी अलिबागला गोवा रोडवरून जायचं म्हणजे प्रचंड ट्रॅफिक. त्यापेक्षा आरामात दुपारी घरातुन निघायचं तोपर्यंत पेण, वडखळनाका मोकळा होईल असा अंदाज होता. आम्ही दुपारचे २ वाजले तरी घरातच होतो. तेवढ्यात एक फोन आला. तो फोन हॉटेलमधून होता. "तुम्ही दुपारी हॉटेल मध्ये जेवणार आहात का? कारण हॉटेलचा किचन बंद होईल". आता त्याला कुठे सांगू आम्ही अजुन घरीच आहोत. त्याला सांगितलं कि आम्ही २ तासात पोहोचु. जेवणाची काळजी नाही, आम्ही जेवलोय म्हणून फोन ठेवून दिला.
प्रवासाला सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे रस्त्यात जास्त ट्रॅफिक नव्हती. मध्ये एका ठिकाणी चहासाठी थांबुन वडखळनाका मागे टाकलं. मध्येच खरमरीत रस्ता तर मध्येच एकदम चांगला पण त्यातल्यात्यात चांगलाच म्हणावा लागेल. अलिबाग जवळ आल्यावर मोबाईलवर जीपीएस चालू केला. हॉटेलच नाव टाकुन जीपीएस जसा सांगत होता तसतसे आम्ही जात होतो. "टेक राईट टर्न, आफ्टर १०० मीटर्स टेक लेफ्ट टर्न" अस करत करत आम्ही एकदम जंगलातच आलोय असा भास झाला. सरळ हॉटेलवाल्याला फोन लावला. तो म्हणाला बरोबर आहे या तसेच पुढे. २ मिनीटांनी आमचा जीपीएस "युवर डेस्टिनेशन इज ऍट द राईट." आणि उजवीकडे हॉटेल होतं.
एकदम उत्तम लोकेशन. समोर वर्सोली बीच, आजुबाजूला झाडं, रहदारीपासून दूर आणि हॉटेलही छोटच, फक्त ८-९ रूम्स. म्हणजे तिथेही वर्दळ नव्हती.






आम्ही पोहचलो तेव्हा ५ वाजले असतील. सूर्य मावळतीकडे झुकला होता. हॉटेल्सचे सोपस्कर पुर्ण करुन आम्ही दोघे किनाऱ्यावर फेरफटका मारायला गेलो. मंद वारा, समुद्राच्या लाटांचा आवाज, किनाऱ्यावर मुलांचा रंगत आलेला क्रिकेटचा डाव अगदी मन प्रसन्न करणारं वातावरण होतं ते. अस वाटत होतं की ही वेळ पुढे सरकुच नये पण सुर्यदेव थोडी ऐकणार होते. तो आपला हळुहळु पश्चिम क्षितिजावर आला आणि पाण्यात शांतपणे दिसेनासा झाला. संधी प्रकाशात समुद्रातल्या होड्या किनाऱ्यावर विसावत होत्या. क्रिकेटचा डावही आटोपण्यात आला. भेळ, पाणीपुरीवाल्यांकडे गर्दी वाढली. आम्हीही एक-एक भेळ घेतली आणि हॉटेलवर परत आलो. तो पर्यंत अंधार झाला होता. रात्रीच्या जेवणात चांगला सीफुडचा आस्वाद घेतला.  
दुसऱ्या दिवशी आरामात आवरुन चहा-नाश्ता झाल्यावर आम्ही अलिबाग फिरायला बाहेर पडलो. सर्वात आधी अर्थातच घरी फोन. सर्व उत्तम आहे, तब्येत बरोबर आहे, काही त्रास नाही. फोन झाल्यावर गाडी बिर्लामंदिराच्या दिशेने काढली. बिर्ला मंदिर जेमतेम ३० किमी पण छोटा रस्ता आणि थोडेफार खड्डे म्हणून आम्ही आरामातच गाडी पुढे नेत होतो. अलिबाग-मुरुड/जंजिरा रस्त्यावर रेवदंडा मागे टाकल्यावर एक खाडी पुल ओलांडून लगेच बिर्ला मंदिरासाठी डावीकडे वळायचं. मंदिराबाहेर आपल्याला नेहमीप्रमाणेच हारवाले भेटतील जे तुम्ही गाडीतुन उतरल्या उतरल्या मागे लागतात. गेट मधुन आत गेलात कि फोटोग्राफीला मनाई आहे. मंदिर टेकडीच्या माथ्यावर आहे आणि तिथपर्यंत जायला पायऱ्या. पायऱ्यांच्या बाजूने गार्डन्स. आम्ही पोहचला तेव्हा नुकतच मंदिर बंद झालेलं. तरी दरवाज्याच्या जाळीतुन मुर्तीच दर्शन झालं. मुख्य मंदिर गणपती आणि रिद्धी-सिद्धी दोन्ही बाजुला, सभोवताली शंकर-पार्वती आणि राधा-कृष्ण ह्यांचेही छोटेखानी गाभारे आहेत. अगदी सुंदर मंदिर, मंदिराचे कर्मचारी स्वच्छतेची विशेष काळजी घेत असतात. मंदिराच्या परिसरात थोडास फिरुन झाल्यावर खाली परत आलो. एक-एक नारळपाणी आम्ही दोघांनी घेतला आणि परत अलिबागला फिरलो.



रेवदंड्याचा किनारा एकदम छान आहे अस ऐकलं होतं, म्हणुन रेवदंड्याला पोहचल्यावर गाडी शहरात घुसवली. अगदी निमुळते रस्ते त्यात रविवारचा बाजार, रस्तावरची रहदारी. आम्ही कदाचित रस्ता चुकलो होतो आणि त्यात गर्दीमुळे खुप वैताग आला. मग सरळ रेवदंडा बीचच बेत रद्द करुन पुढे निघालो आणि नागाव बीचवर आलो. सूर्य चांगलाच वर आला होता आणि उन्हाचे चटके बसत होते. गाडी पार्किंग पण एकदम उन्हात भेटली. बीच एकदम गजबजलेलं. रविवार म्हणजे मुंबई-पुण्याचे पर्यटक इकडे जास्त येतातच. समुद्राला ओहोटी असल्याने पाणी एकदम आत होत आणि समुद्रकिनारा त्यामुळे अजुनच मोठा वाटत होता. घोडागाडी, बनाना राईड, मोटारबोट असा सगळं काही त्या बीचवरआहे. परफेक्ट फॅमिली पिकनिक स्पॉट. सीफुड आवडणाऱ्यांची तर मजाच मजा. बीचवर लाईनने हॉटेल्स आणि सगळ्या हॉटेल्स मध्ये पापलेट थाळी, सुरमई थाळी, बांगडा थाळी मेनु मध्ये वर. म्हणजे मेनुच तो आहे. लिहितानाही माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. व्हेज आणि चिकन थाळी पण आहे. आम्ही मस्त पापलेट थाळीवर ताव मारला. एकदम छान पापलेट फ्राय, त्याबरोबर कोळंबीचा रस्सा, तांदळाची भाकर आणि भात. पोटभर जेवुन झाल्यावर आम्ही परत अलिबाग मध्ये आलो.






अलिबाग बीच वर जास्त वर्दळ जाणवली नाही. शाळेच्या सहलीतली मुलं आणि मोजके पर्यटक. बहुतेक करून सगळे नागाव, काशीद बीच वरच जास्त जात असतील. अलिबाग बीचवरुन समोर कुलाबा किल्ला दिसतो. मी ऐकलं आहे कि ओहोटीच्यावेळी आपण चालतही किल्ल्यात जाऊ शकतो. खरं काय ते मला नाही माहीत. तिथे जास्त वेळ न घालवता आम्ही परत हॉटेलवर आलो कारण मुख्य म्हणजे आम्हाला बीचवर प्रीनॅटल फोटोशुट करायचा प्लॅन होता आणि आमचा हॉटेल होतं ते बीच उत्तम होतं.





चहापाणी झाल्यावर आम्ही बीचवर आलो आधी मी मंजुश्रीचे एकटीचे फोटो घेतले. आम्ही त्यासाठी गुगल वर आधीच बरेचसे पोझेस बघून ठेवले होते. त्यातले जे जमतील तसे फोटो काढले. आता वेळ आली ती दोघांचे फोटो काढायचे आणि त्यातच खरी मजा होती. कारण आमच्या दोघांचे फोटो कोण काढणार? बीच वर आम्ही आमचा फोटो कोण काढु शकतो, हा विचार करत येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडे नजर टाकु लागलो. एक १५-१६ वर्षाची मुलगी आपल्या आईबरोबर बीचवर फिरत होती. आम्ही विचार केला हि काढु शकते, तिला कदाचित आवडेल आणि तिला विचारलं. पण आमच्या अपेक्षेपेक्षा उलट तिने थोडीसी नाराजी दाखवताच कॅमेरा हातात घेतला. तिने फक्त २ फोटोतच आम्हाला कॅमेरा परत दिला आणि निघून गेली. आम्ही विचार केला काय झाला हिला , आमचे पोजेस पण साधेच होते. जसा काय आम्ही हिला .... जाऊदे!! मग एक नवरा-बायको आपल्या ३-४ वर्षाच्या मुलाबरोबर बीचवरुन हॉटेलवर पार्ट जात होते. आमच्याच हॉटेल मध्ये थांबले होते आणि मुंबईतुन आलेले वाटले. त्यांना गाठलं. त्यादोघांमधल्या तिने उत्साहाने कॅमेरा घेतला. आम्ही पुन्हा पोजेस द्यायला सुरुवात केले आणि तिनेही फोटो काढले. कॅमेरा परत देताना तिने विचारलं "न्युली मॅरीड?". मी फक्त मंजुश्रीच्या पोटाकडे बघितलं आणि तिला कळलं . एवढा वेळ तु आमचे फोटो काढत होती तुला कळलं नाही. कमल आहे बाबा! ती पुढे गेल्यावर आम्ही एवढे हसलो आणि मनोमन सुखावलो की ३ वर्षांनंतरही लोकांना आम्ही न्युली मॅरीड वाटतो. अजूनही आमची फोटोंची हौस भागली नव्हती. २-३ पोजेस अजुन डोक्यात होत्या. मग २ मैत्रिणींना पकडलं. त्यांनी मात्र काहीही आढेवेढे न घेता आमचे पाहिजे तसे फोटो काढले आणि जाताना शुभेच्छाही देऊन गेल्या. मग जवळच दगडावर बसुन आम्ही काढलेले फोटो बघितले. पाहिजे तसे बऱ्यापैकी फोटो निघाले होते. सुर्य मावळेपर्यंत तिथेच बसून राहिलो आणि हॉटेलवर परत आलो.


सकाळी उठून आम्ही मुंबईला निघालो. अगदी मनासारखी सुट्टी झाली होती. आता परत अलिबागला येऊ तेव्हा आम्ही दोघांचे 'चार' झालेले असु हो चार! जे त्या दोन मैत्रिणींनाही आमच्या एका पोज वरून लगेच समजलं.

मयुरेश मांजरे
+९१ ९८६९७५६३३०

Saturday, 10 September 2016

कळसुबाई - नाईट ट्रेक

महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कुठलं? हा प्रश्न जेव्हा मला चौथीच्या भुगोलात विचारला जायचा तेव्हा मला नाही वाटत मी कधी त्याचं बरोबर उत्तर दिल असेल.
त्यानंतर नववीला असताना सामान्यज्ञान ह्या विषयावर शाळेत एक परीक्षा होती त्यात भारतातले सर्वात उंच शिखर कुठलं ह्या प्रश्नावर मी बिनधास्त कळसुबाई हे उत्तर देऊन बाहेर आलो होतो आणि हे फक्त मीच नाही तर मला थोडाफार जास्त येत असं जे कोणी वर्गात समजत होते त्यांनाही पर्यवेक्षकाची नजर चुकुवून कळसुबाई लिहा हे सांगितलं. एखाद्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर एवढ्या आत्मविश्वासाने कोणीही सांगितलं नसेल.
त्यानंतर कॉलेजात गेल्यावर ट्रेकिंगला जायचे प्लॅन सुरु झाले. तेव्हापासूनच एकदातरी कळसुबाईवर चढाईचा बेत आखायचा हे पक्क केलं.
पण मनातला हा बेत बरेच वर्ष मनातच राहिला
एके दिवशी असच वर्तमानपत्र वाचताना एक बातमी वाचली की एका जोडप्याने आपलं लग्न कळसुबाईवर केलं. त्यांनी जवळपास ३०-४० वेळा शिखर सर केलं होत आणि आता तर चक्क लग्नच शिखरावर. कमाल आहे ह्यांची.
योगायोगाने ह्याच जोडप्याचा नंबर मला मिळाला आणि त्यांच्याकडुन व्हाट्सऍपवर शिखराची माहिती काढली.
त्यांनी आम्हाला सांगितलं कि तुम्ही नाईट ट्रेक करा आणि सकाळी कळसुबाई वरून सूर्योदय बघा. महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावरुन सूर्योदय पाहण्याची कल्पना जाम आवडली.
बस आता अजुन उशीर नाही, लगेच माझ्या चांडाळ चौकडीला विचारलं
त्यातला एक मित्र आधी गेला होता पण नाईट ट्रेक ची कल्पना सगळ्यांना भारी वाटली.
शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमधुनच परस्पर लोकलने जाण्याचं ठरल. शुक्रवारी रात्री ट्रेक, शनिवारी दुपार पर्यंत परत खाली, संध्याकाळी घरी आणि रविवारी आराम. 
आमच्या चौकडी मधल्या एकाने अपेक्षेप्रमाणे आम्हाला टांग दिली आणि आम्ही तिघेच उरलो. त्यात मग माझा मेव्हणा आम्हाला जॉईंट झाला आणि पुन्हा आमची चौकडी तयार झाली. 
शुक्रवारी सकाळी घरुन निघताना बॅग भरुन घेतली. ट्रेकचे कपडे, खाण्यासाठी थोडंफार आणि कॅमेराने बॅग टम्म फुगली.
दिवसभर कामात लक्ष लागत नव्हतं, ग्रुपवर सुद्धा आमचे मेसेजवर मेसेज चालु होते.
"वेळेवर पोहचा"
"ट्रेन चुकुन द्यायची नाही"
"गर्दीची वेळ असेल पण कसही करुन ट्रेन मध्ये चढायचच"
ट्रेक पेक्षा जास्त साहस आम्हाला आम्ही जी ट्रेन ठरवली होती ती पकडण्यासाठी दाखवावी लागणार होती.
ऑफिस मध्ये पण सगळे जण,
"वो ट्रेन पकडणे वाले हो, आप की तो वाट है आज"
"तुम्ही कल्याणला जाऊन ती ट्रेन पकडा"
"पुढे गर्दी कमी असते, तिकडे चढ"
असे बरेच सल्ले ऑफिसच्या मित्रांनी दिले.
ह्या सगळ्यामुळे खरोखरच मोठ्या मोहिमेवर चाललो आहे असा वाटायला लागलं.

आम्ही सगळ्यांनी मग ट्रेन पकडण्यासाठी प्लॅन केला,
एकाने ही कसारा लोकल सीएसटीवरुनच पकडायची, म्हणजे नो टेन्शन.
बाकी आम्ही दोघांनी ठाण्यावरुन कल्याणला जायचं आधीच्या लोकलने ज्यात गर्दी कमी असेल आणि मग मागुन येणारी कसारा लोकल पकडायची. कल्याणला थोडी गर्दी उतरेल मग चढायला जमेल.
अजुन एक आम्हाला कल्याणलाच भेटणार.
एकदम प्रॉपर आखणी बस आता होऊन जाऊदे.

संध्याकाळी तयारी करुन ऑफिसमधुन निघालो. ठाणे स्टेशनला पोहचलो. इथे आम्ही लोकल पकडण्याचा केलेला प्लॅनला पहिला तडा बसला. म्हणजे तुम्ही कितीही फुलप्रुफ प्लॅन केला आणि तो ऐनवेळी फिस्कटला नाही तर मग तो प्लॅन कसला.
माज्याबरोबर सागर ठाण्यावरुन कल्याणला येणार होता त्याचा कुठेही पत्ता नव्हता. अरविंद जो सीएसटीवरुनच लोकल पकडणार होता त्याने लोकल पकडली होती.
मी एकटाच पुढे कल्याणला गेलो आणि सागरला सांगितलं आता तु ठाण्यावरुनच पकड ती लोकल.
मी कल्याणला पोहचलो, थोडाफार नाश्ता केला.
सागरने ठाण्यात लोकल पकडण्याच दिव्य साकारलं होत, म्हणजे प्लॅन पुर्वपदावर.
लोकलची वेळ झाली, विजय अजुन आला नव्हता, त्याला फोन लावला तर तो दोन मिनिटात पोहचेल बोलला, त्याला सांगितलं "तु ये लवकर आणि जिथे भेटेल तिथे लोकलमध्ये चढ नंतर आपण भेटू."
मी प्लॅटफॉर्मवर आलो. प्लॅटफॉर्म आधीच माणसांनी भरून गेला होता. मी गर्दीत जाऊन उभा राहिलो. विजयचा अजून पत्ता नव्हता.  लोकल आली आणि हा एकच गोंधळ.
"ए उतरुन द्या आधी"
"झोपला काय उतर लवकर"
"अरे चाल आतमध्ये"
उतरणाऱ्यांची आणि चढणाऱ्यांची रेटारेटी सुरु झाली. नशिबाने मी अश्या ठिकाणी उभा होतो जिथे मागच्या लोंढ्याने मला 'सुखरूप' लोकलच्या आतमध्ये नेऊन ठेवलं.
आतमध्ये चढलेले जशी जागा भेटेल तसे स्वतःला फिट करायचा प्रयत्न करत होते, जे अजुन चढले नव्हते ते गर्दीला आत ढकलत होते.
ह्या सगळ्यात तुमच्या कानावर असंख्य अश्या शिव्या कानावर पडतील. जर तुम्हाला शिव्या येत नसतील किंवा शिव्यांचा स्टॉक वाढवायचा असेल तर ह्या ट्रेन ने नक्की प्रवास करा. ३-४ मिनिटांनी लोकल हलली. डब्यामध्ये आता मुंगी शिरायलाही जागा नव्हती. पुढच्या स्टेशनला शहाडला थोडी गर्दी कमी झाली तेव्हा फोन बाहेर काढता आला आणि फोनाफोनी सुरु झाली. विजयची लोकल चुकली होती. प्लॅन फसला होता.  अरविंद, सागरना सांगितलं कि मी लोकलमध्ये आहे. नंतर टिटवाळा गेल्यावर तर लोकल पुर्णपणे खाली झाली. आरामात बसायला जागा मिळाली.
आम्ही पावणेनऊच्या आसपास कसाऱ्याला पोहचलो होतो. विजयला कल्याणवरून पुढची कसारा लोकल मिळाली होती जी साडेनऊला पोहचणार होती.
कसाऱ्यावरुन आम्हाला कसारा- अकोले एसटी पकडुन कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या बारी गाव गाठायचं होत. पण साडेनऊ नंतर बारीला जाण्यासाठी एसटी नव्हती किंवा खाजगी गाडीही नव्हती. बारी गावात भाऊ अवस्कर ह्यांच्याशी आमचं बोलणं झाल होत. तेच आमची रात्रीच्या जेवणाची आणि नाईट ट्रेक साठी गाईड देणार होते.
आम्ही बारीच्या भाऊंना फोन करुन झालेला प्रकार सांगितला. कसारा ते बारी हे दीड तासाचं अंतर असेल पण भाऊ स्वतः त्यांची गाडी काढून आम्हाला घेण्यासाठी निघाले. साडेनऊ वाजता विजय मागच्या लोकलने  पोहचला, तोपर्यंत १५-२० मिनिटांनी भाऊपण आले आणि आम्ही गाडीतुन बारीला निघालो.
कसारा ते बारी रस्ता तसा एकदम चांगला. रस्त्यात इगतपुरी, घाटातली वळणे. अंधारामुळे बाहेर जास्त काही दिसलं नाही. घोटीच्या पुढे रस्ता एकदम चिडीचुप, निर्जन.
बारी जवळ येताच भाऊंनी आम्हाला कळसुबाई शिखरावर चालु असलेली विजेचा दिवा दाखवला.
"बापरे एवढ्या वर जायचंय"

बारीला पोहचल्यावर साडेअकरा पर्यंत जेवणं उरकली. जेवण आपलं साधं घरगुती पण चविष्ट.
त्यानंतर एक नेहमीचा ठरलेला टोमणा,
"तुम्ही मुंबईवाले काही खात नाही, खावा पोटभरुन. शिखर चढायचं आहे तुम्हाला"

भाऊंनी आमच्याबरोबर येणाऱ्या गाईडची ओळख करून दिली आणि ते झोपी गेले. गाईडने सांगितलं कि वर पोहोचायला ४-५ तास लागतील, थोडा आराम करा मग निघु आणि ते ही डुलकी काढु लागले. हवेत गारवा होता. हिवाळ्याचे दिवस होते ते. आम्ही थोडावेळ पत्ते कुटत बसलो. मग रात्रीच्या अंधारात थोड फोटो काढण्याचा टाईमपास केला.
१२:३० कधी वाजले कळलच नाही. मग निघणाच्या निर्धाराने गाईडना उठवलं आणि म्हंटल चला आता.

"गणपती बाप्पा ...... मोरया"

भाऊंच्या घराच्या मागुनच एक छोटा रस्ता सुरु होतो, त्या रस्त्यावरुन चालायला सुरुवात केली. पाच मिनिटांनी मुख्य बारी गावात आम्ही आलो. आता पर्यंत रस्त्यावरचे दिवे आणि गावातले दिवे आमच्या सोबतीला होते. आता गाव मागे टाकुन आम्ही रानातुन चालु लागलो. अजुन चढणीला सुरुवात नव्हती. शेताच्या बांधावरच्या पायवाटेवरुनच पुढे जात होतो.
पायवाट संपताच घाटासारखा कच्चा रस्ता लागला, दोन्ही बाजुने बांध आणि झाडं आणि मधुन जेमतेम एखादी बैलगाडी जाईल एवढा रस्ता . २०-२५ मिनिटांनी आमचा पहिला पडाव एका मंदिरापाशी पडला. चांगली ऐसपैस जागा होती.
वडापिंपळाची झाडं, दुपारच्या उन्हात मस्त सावलीत गप्पा मारत पडायला योग्य.
पुढे निघाल्यावर एक छोटीशी लोखंडी कमान स्वागत करते आणि तिथून पुढे खरी चढाईला सुरुवात होते. रात्रीच्या ट्रेकचा हा आमचा पहिलाच अनुभव होता. बॅटरीच्या प्रकाशात पुढे पुढे जात होतो. मध्ये मध्ये बऱ्याच पायवाट दिसत होत्या. पण गाईड मुळे काही चुकण्याचा  प्रश्न नव्हता. एकदम शांत वातावरण, वर स्वच्छ आकाशात शुभ्र चांदण्या आणि रात्रकिड्यांचा आवाज, अगदी छान वाटत होत. वाटेत ठिकठिकाणी छोट्या छोट्या चहा, लिंबूसरबताच्या टपऱ्या वजा झोपड्या होत्या. अर्थात त्या रात्रीच्या बंद होत्या. १५-२० मिनटं चालल्यावर अशाच एखाद्या बंद टपरीच्या बाहेर ठेवलेल्या बकड्यांवर थोडावेळ विसावा घेऊन पुढे जात होतो. चांदण्यांच्या प्रकाशात चालण्याची मजाच निराळी होती. एवढा वेळ चालल्यामुळे शरीरातली थंडी कुठल्याकुठे गायब झाली होती.
वाटेत पहिली लोखंडी शिडी लागली. शिडी चढुन गेल्यावर खाली बघितलं, सर्वत्र काळोख. खाली दूर गावात विजेचे दिवे टिमटिमत होते. काळोखामुळे किती उंचावर आहोत ह्याचा अंदाज येत नव्हता. त्यातच आकाशात मला तारा निखळल्याचा दिसला. सिनेमात पाहिल्याप्रमाणे मी लगेच मनातल्या मनात इच्छा मागुन मोकळा झालो. पुढे गेल्यावर आम्ही एका विहिरीपाशी आलो. तिथे एक चहाच्या विसाव्यासाठी झोपडी होती. तिथून झेंडा वाऱ्यामुळे जोरात फडकण्याचा आवाज येत होता. गाईडने सांगितलं आता वर फक्त २० मिनिटच आहे आणि वारा खूप वाटत आहे. थोडावेळ इथेच आराम करा. ४-४:३० वाजले असतील. झोपडीत बरीच बारदान, प्लॅस्टिक होते, त्यांचच अंथरुण बनवलं. आता थंडी जाणवु लागली होती. वाऱ्याचाही सुं-सुं आवाज येत होता. स्वेटर, हातमोजे, कानटोपी सर्व घातलं तरीही थंडी जाणवत होती. कशेबशे आम्ही झोपण्याचा प्रयत्न केला पण थंडीमुळे झोप येत नव्हती. तसाच पडून राहिलो. पण कितीवेळ पडून राहणार, शेवटी बाहेर आलो. नुकतीच चंद्राची कोर पुर्व क्षितिजवर उगवली होती. मिचमिचणाऱ्या चांदण्यांमध्ये चंद्राची कोर उठावदार दिसत होती. थंडी तर जाणवत होतीच. बाकीचेही जागे झाले आणि बाहेर आले. सगळ्यांनी आजुबाजुला पडलेला पालापाचोळा आणि लाकडं गोळा करून शेकोटी पेटवली आणि अंगातली थंडी पळवायचा प्रयत्न केला. थोड्यावेळात पुर्व क्षितिजावर उजाडू लागलं. आम्ही गाईडला उठवलं आणि पुढची चढाई सुरु केली. शेवटची लोखंडी शिडी पार करून आम्ही शिखरावर पोहचलो.
शिखरावर पोहोचताच शरीरातला सगळा थकवा निघुन गेला. महाराष्ट्रातल्या सर्वोच्च शिखरावर होतो आम्ही. पुर्वेला आता लाली आली होती. सर्वत्र चांगला उजेड पडला होता. आमचं फोटोसेशन जोरात सुरु होतं. शिखरावर एक कळसुबाई मातेचं मंदिर होतं. आनंदाची गोष्ट म्हणजे शिखरावर फक्त आम्हीच होतो. शिखरावरुन एका बाजुला रतनगड, एका बाजूला भंडारदरा धरणाचं जलाशय तर एका बाजुला बारी गाव. सर्व परिसर पाहुन झाल्यावर एका ठिकाणी निवांत बसलो. समोर सूर्योदय होत होता. नाईट ट्रेकचा विचार अगदीच चांगला होता हे आता पटत होतं. सोबत आणलेली शिदोरी सोडुन थोडी पेटपुजा केली.  गाईडने आम्हाला परिसराची माहिती दिली. उजेडात दिसत होतो कि आम्ही नक्की किती उंचावर आलो आहोत आणि ते पाहुन स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. बराच वेळ शिखरावर घालवल्यावर निघायचं ठरलं. कळसुबाई मातेचं दर्शन घेऊन आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. विहिरीवर परत  आल्यावर हातपाय धुतले. रात्री आसरा दिलेल्या झोपडीचे आभार मानुन पुढे सरकलो. प्रत्येक वळणावर आमच्या सर्वांची प्रतिक्रिया असायची "बापरे! आपण रात्री हे चढलो". एक तासानंतर आम्हाला पहिला ग्रुप वर चढताना दिसला. त्यांनी आम्हाला विचारलं, "आला पण वर जाऊन?". आम्ही अभिमानाने, "नाईट ट्रेक केलाआहे, रात्रीच वर पोहोचलो होतो". पुढे वर चढणारे ट्रेकर्स ग्रुप वाढत गेले. सर्वाना आम्ही गर्वाने सांगत होतो की आम्ही नाईट ट्रेक केला आणि कोणी आम्हाला विचारलं कि अजून किती वर जायचा आहे तर मुद्दामून त्यांना सांगायचो वेळ वाढवुन सांगायचो, "अरे अजून तुम्ही ३०%च वर आला आहात, अजून खूप वर जायचा आहे." तसे ते रागाने बघायचे.
बऱ्यापैकी खाली आलो तेव्हा वाटेतले सगळ्या चहाच्या टपऱ्या उघडल्या होत्या. एके ठिकाणी थांबुन पोहे खाल्ले आणि चहा मारला. थोडी तरतरी आली. त्यानंतर न थांबता खाली उतरलो. ११ वाजले असतील. गावात बरीच वर्दळ होती. रस्त्यावर आलो तेव्हा एक ट्रॅक्टर बाजूने जात होता. ट्रॅक्टरवर चढुन आम्ही भाऊंच्या घरी पोहचलो. आमचे गाईडसाहेब मागे गावातच थांबले होते. भाऊंनी आधीच जेवण तयार करून ठेवलं होतं. जेवणार ताव मारून आम्ही कसाऱ्याला जाणाऱ्या एसटीची वाट पाहत थांबलो. एसटीत चढलो आणि जे ताणून दिली ते कसारा आलं तेव्हाच डोळे उघडले. पाय आता दुखायला लागले होते. शुक्रवार संध्याकाळपासुन सकाळपर्यंत केलेली मजा आता चांगलीच बाहेर येत होती. कधी एकदा घरी पोहचतोय असा झालं होत. कसाऱ्यावरुन लोकल पकडली. कल्याणच्या पुढे ती तुडुंब भरली. गर्दीतून वाट काढून ठाण्याला उतरलो. ठाण्यावरुन नेरुळ लोकल पकडून घरी पोहचलो. छान अंघोळ केल्यावर बिछान्यावर पडताच झोपी गेलो.















मयुरेश मांजरे
+९१ ९८६८७५६३३०

कृपया ब्लॉग फॉलो करा 

Sunday, 17 July 2016

तोरणा किल्ला

सह्याद्री पर्वताच्या रांगेतील सर्वात उंचावर असलेला किल्ला. १३व्या शतकापासून हा किल्ला दिमाखात उभा आहे. ४६०३ फुट समुद्रसपाटीपासून उंचीवर असलेला हा किल्ला नक्कीच आपल्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या किल्ल्यांमध्ये मिरवत असेल की अरे मीच तो ज्याला छत्रपतींनी अवघ्या वयाच्या १६व्या वर्षी जिंकुन १६४३ साली हिंदवी स्वराज्याच तोरण बांधल.
आम्ही ४ मित्रांनी पावसाळ्यात किल्ल्यावर जायचा बेत आखला. ४-५ तासाचा प्रवास म्हणुन सकाळी ५ वाजताच निघायच ठरवलं. पण वेळ ठरवणं आणि पाळणं ह्यात फरक आहे. तरी ६ वाजता आम्ही घर सोडलं. मित्राची नवीन गाडी आणि नेहमीपेक्षा बदल म्हणजे आज मी गाडीच्या मागच्या सीटवर बसुन आराम करत होतो. द्रुतगती मार्गावर लागलो तेव्हा थोडंसं उजाडायला लागलं होतं. पाऊस पण मस्त पडत होता. अहाहा!! मागच्या वर्षी ह्याच पावसाने पाठ फिरवली होती म्हणुन ह्यावेळी तर अजूनच हवाहवासा वाटत होता.
गेल्या १५ दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे सगळं हिरवंगार झालं होतं. डोंगरांमधून छोटे छोटे ओहोळ वाहु लागले होते. ढगांनी डोंगराच्या माथ्यावर गर्दी केली होती. ह्यातच आम्ही घाट चढायला सुरुवात केली होती. रस्त्यावरुन दिसणारे धबधबे आम्हाला खुणावत होते. जाऊदे तो एवढा प्रवास, इथेच पाण्यात डुंबायचं का हा विचार मनात येत होता पण मनावर ताबा ठेवुन पुढे जात राहिलो. घाट चढून तळेगाव टोल नंतर आम्ही आपला पहिला विसावा घेतला. गाडीत पेट्रोल भरुन आम्हीही भरपेट नाश्ता केला. गाडीचा चालकसुद्धा बदली झाला. पण मी काही मागची आराम करायची सीट सोडली नाही. द्रुतगती मार्ग संपल्यावर बालेवाडी - चांदणी चौक - वारजे - कात्रज - खेड शिवापूर कापत गाडी सुसाट जात होती पण शेवटी एक ठिकाणी ट्रॅफिक जाम लागलंच. नवीन पुलाच काम आणि त्यात पर्यायी रस्त्यावर खड्डे. जवळपास एक तास आमचा त्या जाम मध्ये गेला. नंतर लगेचच नसरापूर फाट्याला मुख्य हाईवे सोडून उजवीकडे वळण घेतलं.
नसरापूर ते व्हेल्हे (तोरणाच्या पायथ्याशी असलेलं गाव) रस्ता एकपदरी पण छान होता. अधेमध्ये खडबडीत रस्ता सोडला तर गुळगुळीत रस्ता होता. पायथ्याशी पोहचायला आम्हाला ११ वाजले. गावातुन एक रस्ता पुढे गडाकडे जात होता पण खुपच चढणीचा रस्ता वाटत होता. आजुबाजूला चौकशी केली तर बोलले की आहे चांगला रस्ता, वरती पठारापर्यंत जाते गाडी. तिथे पार्किंगची सोय आहे. मी मागे लोणावळ्याला गेलो होतो तेव्हा अश्या चढणीवर गाडी चढवली होती, त्यामुळे मी गाडी हातात घेतली. समोर दिसणारा चढ लगेचच पार केला पण एक मिनिट! रस्ता इथेच संपला नव्हता, पुढे रस्ता अजूनच निमुळता होता आणि त्यात चढणीचे यु-टर्न. जसजसा पुढे जात होतो माझ्या पोटात भीतीचा गोळा येत होता. असा वाटत होतं, बस!! इथेच गाडी सोडून दयावी. पण एक तर गाडी कुठे बाजूला पार्क करायची सोय नाही आणि परत मागे ही घेता येणार नव्हती. शेवटी कसेबसे आम्ही त्या पार्किंगच्या पठारावर पोहोचलो आणि सुटकेचा निःश्वास टाकला.
थोडाफार पिण्याचं पाणी, खाण्याचे डबे घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली. थोड्याच वेळात पावसानेही हजेरी लावली. थोडावेळ छत्री घेऊन चालण्याचा प्रयत्न केला पण नंतर म्हणालो जाऊदे आणि बिनधास्तपणे सर्व भिजतच पुढे चालु लागलो. थोडीशी चढाई केल्यावर एक नजर आम्ही आमच्या डावीकडे टाकली आणि प्रवासामुळे आलेला थकवा कुठच्या कुठे पळाला. समोर बरेचसे पांढरेशुभ्र फेसाळणारे पाणी हिरवी चादर ओढलेल्या डोंगराच्या कडेकपारीतुन कोसळत होते. खाली शेतांमध्ये साचलेलं पाणी बघुन मन प्रसन्न होत होत की ह्यावेळी बळीराजा नक्कीच खुश असणार. पावसामुळे आम्हाला फोटो काढायला जमत नव्हते पण काही हरकत नाही.
थोडस पुढे गेल्यावर एक सपाट भाग लागतो. इथे दोन्ही बाजुला दरी आणि मध्ये पायवाट. तिथुन वर पाहिलं तर तोरणा ढगांच्या धुक्यात हरवून गेला होता. चश्म्यावर पाण्याचे थेंब आणि त्यात धुकं ह्यामुळे जास्त पुढच दिसत नव्हत. पावसाने चांगलाच जोर पकडला, त्यातच आम्ही पुढे पुढे जात राहिलो. वाटेत आम्हाला एक कुटुंब भेटलं जे खाली उतरत होतं. त्यात ४-५ वर्षाची एक मुलगा आणि मुलगी होते. त्यांना विचारलं, "कसा वाटलं वरती?". त्यांनीही उत्साहात उत्तर दिलं "झकास". मध्ये एक कातळ लागलं त्यात कसेबसे चढुन आम्ही वर गेलो. थोडा पुढे गेल्यावर डाव्याबाजूला उभा डोंगर आणि उजव्याबाजुला दरी, पावसामुळे रस्ताही निसरडा. दबकत दबकत पावले टाकत पुढे जात होतो. थोडं आणखी रस्ता कापल्यावर कानावर पाण्याचा आवाज येऊ लागला. तो पुढे पुढे वाढतच गेला आणि मग एके ठिकाणी तर आईशपथ! एक मोठा धबधबा डावीकडच्या डोंगरावरून कोसळत होता, त्याच पाणी पायवाटेवरून वाहत उजव्या दरीत जात होता. तिथे मात्र आम्हाला राहवलं नाही. मित्राच्या मोबाईल मध्ये फोटो टिपले. पाण्यात थोडं भिजल्यावर हुरहुरी आली. पुढे १५ मिनिटातच तोरणा किल्ल्याचा पहिला दरवाजा लागला. आत गेल्यावर एक पाण्याची टाकी लागते. आधी पासून आलेले बरेच जण तिथे होते. समोरच्या घरात चहा-पोहे भेटत होते. भुक लागलीच होती. चांगला पोह्यांवर ताव मारला आणि बॅगमध्ये आणलेले जिन्नस फस्त केले. मग गडावर फेरफटका मारण्याचा प्रयत्न केला पण धुक्यामध्ये काहीच समजत नव्हत आणि त्यात पाऊस, त्यामुळे फोटो ही काढता येत नव्हते. तरी २-३  बुरुजांवर गेलो. समोर दिसणारी दरी किती खोल  ह्याचाही अंदाज येत नव्हता. धुक्यात हरवण्यापेक्षा आम्ही परतण्याचा निर्णय घेतला. 
चढताना ज्या गोष्टी अवघड वाटत होत्या तिथे आरामात खाली उतरलो. पुन्हा वाटेतल्या धबधब्यावर मनसोक्त भिजुन घेतलं. थोडस खाली आल्यावर गडावर जाणारे आम्हाला विचारत होते अजून किती वेळ, आम्हीपण मुद्दामून १ तास जास्त सांगत होतो. थोड्यावेळाने वर जाणाऱ्यांना आम्ही उगाचच आजून खाली किती आहे असा विचारत होतो. एक गुजराती ग्रुप आम्हाला  भेटला, बहुतेक त्यांचा गोंधळ झाला असेल, त्यांना वाटत असेल गाडी गडावर जाते पण एवढी चढाई करायची आहे हे त्यांना माहीत नसावं. बरेच जण तर मागे फिरले होते. त्यात लहान मुलेही होती जी रडत होती. तरी नशीब ते जास्त वर आले नव्हते. आम्ही परत आपल्या गाडीपाशी पोहचलो. पूर्णपणे भिजलेलो, तिथे परत कांदाभजी खाऊन पोटाला शांत केल. पाऊस थोडा थांबल्यावर गाडीजवळच कपडे बदलले. परत त्या खतरनाक रस्त्यावरुन गाडी खाली उतरवली. गाडी व्हेल्हे गावात आल्यावर जिवात जीव आला आणि परतीच्या प्रवासाला लागलो. 
संध्याकाळ आणि त्यात रविवार, वाटेत पहिल्यांदा नसरापुरच्या बाजारामुळे १५ मिनिटे गेली. नंतर खेड-शिवापुरला नाश्ता केला आणि पुढे निघालो तो पुण्यात गाडी फसली. तिथे जवळपास १ तास गेला.  तिथुन निघाल्यावर सरळ आम्ही घरी. 
पाऊस, वाटेतला प्रवास, सह्याद्रीचे हिरवेगार पर्वतरांगा, त्यातुन दुधासारखे पडणारे पांढरेशुभ्र पाणी आणि तोरणाची चढाई सगळच एकदम मस्त!!!

Saturday, 20 February 2016

लोणावळा - छोटीशी सहल

सहज एके दिवशी इच्छा झाली म्हणुन अचानक लोणावळ्याचा बेत आखला. घरापासुन जेमतेम फक्त दीड तास. नेहमी गावी जाताना लोणावळा लागतच पण कधी फिरायला असा तिथे गेलो नाही. म्हणतातना आपल्याजवळ असलेल्या गोष्टींची आपल्याला किंमत नसते. आज जाऊ उद्या जाऊ आणि काय वाटेतच  तर आहे पुण्याच्या, कधीही जाता येईल असाच नेहमीचा विचार. म्हणून म्हंटल नाही आज जायचाच. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन जाताना आजकाल नेहमी मादाम तुसादच्याच्या धर्तीवर बनवलं गेलेलं मेणाच्या पुतळ्यांच संग्रहालयाचे खुपच जाहिरात दिसते. तेही बघायची खूप दिवसापासून मनातइच्छाहोती. म्हणुन आज काढली गाडी आणि लागलो लोणावळ्याच्या वाटेवर.
सकाळी दहाच्या सुमारासच गाडी संग्रहालयाच्या पार्किंग मध्ये शिरली. द्रुतगती मार्गाच्या लोणावळा एक्झिट मधुन बाहेर आलो कि मुख्य रस्त्याला लागुनच असल्यामुळे जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. तिकीट काढून आत गेलो. सर्व प्रथम नजरेस पडतात ते आपले छत्रपती शिवाजी महाराज. हातात तलवार, डोक्यावर जिरेटोप. तरीही महाराजांचा पुतळा तितकासा जमला नाही हे माझ वैयक्तिक मत. महाराजांच्या नजरेत म्हणावी तशी जरब आलेली नाही आणि भारदस्त पणा हि नाही. पुढे आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीचा पुतळा ध्यानस्थ बसलेला आहे. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर,अण्णा  हजारे, बाबासाहेब आंबेडकर, शरद पवार, नरेंद्र मोदी अश्या नेत्यांचे पुतळे.  काही पुतळे बघुन तर साक्षात तीच व्यक्ती पुढ्यात उभी असल्याचा भास होतो तर काही पुतळे कधीकधी ओळखुच येत नाही. अश्या वेळी समोर असलेली नावाची पाटी मदत करते आणि मग आपण विचार करतो हा खरच असा वाटतो. खेळाडू, सिनामातले कलाकरांचे पुतळे हि इथे पाहायला मिळतील. सर्व पुतळ्यांबरोबर फोटो टिपत पुढे जात होतो. तिथे काही शाळांची सहल आली होत. मुलांनी त्यांच्या आवडत्या व्यक्तींच्या पुतळ्याबरोबर एक क्लिकसाठी गर्दी केली होती. त्यांच्यासारखेच नक्कल करुन फोटो काढण्यात तर वेगळीच मजा येत होती. सेल्फींचाही धडाका चालु होता. सर्व पुतळे बघुन झाल्यावर आम्ही बाहेर पडलो.
दुपारही झाली होती आणि आता पोटात कावळे ओरडू लागले होते. समोरच मनशक्ती प्रयोग केंद्र आहे. तिथे जेवलो आणि टाईगर पोईंटला निघालो. बऱ्याच दिवसांनी लोणावळ्यात गाडी घातली होती. एक्स्प्रेस-वे मुळे तर बाहेरच्या बाहेरूनच प्रवास होतो. अजूनही फारसा बदल दिसला नाही. टाईगर पोईंटला रस्ता तसा चांगला होता. रस्त्यात तुम्हाला आयएनएस शिवाजी हे भारतीय नौसेनेचे प्रशिक्षण केंद्र लागेल. तसेच पावसाळ्यातल प्रसिद्ध ठिकाण म्हणजे भुशी धरणही ह्याच रस्त्यावर आहे. पुढे एक वळणावळणाचा घाट चढुन गेल्यावर थोड्या अंतरावर  टाईगर पोईंट येईल.
अतिशय निसर्गरम्य परिसर. भर दुपारीही छान वारा सुटलेला. फमिली पिकनिक साठी तर उत्तम जागा. समोरच ६५० मीटर खोल दरी. पावसाळ्यात तर नक्कीच इथला परिसर अगदी मोहक असेल. मनोरंजनासाठी उंटाची सफारी, बग्गी गाड्या आहेत पण त्यांचे दरही तसेच आहेत.
थोडावेळ तिथे टाईमपास केला. मस्त फोटो काढले आणि पुन्हा लोणावळ्यात आलो. तिथुन परतीच्या मार्गाला लागलो. वाटेत खंडाळ्यात घाट सुरु होण्याआधी एक छोटस उद्यान आहे. तिथुन दिसणारा परिसर अतिशय सुंदर आहे. एक्स्प्रेस-वेच्या रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्या आपण उभे असतो त्या खालच्या डोंगरात गुडूप होतात. तिथे असणाऱ्या माकडांपासून जर जपुनच राहिलेल बर. आपल्याजवळ काही पदार्थ दिसले की लगेच हिस्कावायला पुढे येतात. तिथून निघाल्यावर नेहमीप्रमाणे वरदविनायकाचे दर्शन घेतले आणि घरी परतलो. एकादिवासाची छोटी पण मस्त ट्रीप झाली.