Sunday, 25 May 2025

थांब... श्वास घे... आणि जग : हिमालयात एक दिवस

हिमालय म्हणजे पृथ्वीवरचं एक जिवंत चमत्कार. जगातील सर्वात उंच पर्वतरांग – जिथं एव्हरेस्टकांचनजंगानंदा देवी, आणि केदारनाथबद्रीनाथ यांसारखी धार्मिक स्थळं विसावलेली आहेत. हे केवळ डोंगर नव्हेत – ह्या शिखरांमध्ये देवत्वाचं वास्तव्य आहे, असं मानलं जातं.

हिमालय म्हणजे निसर्गाची सर्वात भव्य, पण तरीही नम्र रचना – जिच्यासमोर उभं राहिलं की मनात एकच भावना उरते – "आपण किती लहान आहोत!" आणि नागटिब्बा हे या महान हिमालयाचंच एक कोवळं, शांत, पण भारदस्त अंग आहे – जिथं आपण थोडं स्वतःपासून दूर जाऊन, पुन्हा स्वतःकडे परत येतो. जणू हिमालय आपल्याला शांतपणे सांगतो की, "थांब… श्वास घे… आणि जग!"

आमचा मित्र ओंकार याची देहरादुनला डिसेंबर मध्ये परीक्षा होती. डिसेंबर तसं थोडंसं आरामाचा आणि सुट्टीचा महिना. म्हणुन आम्ही विचार केला की आपण पण जाऊ ओंकार बरोबर आणि ओंकारची परीक्षा झाली की लगेच तिथेच आजूबाजूला कुठेतरी छोटी बजेट ट्रिप करू. इंटरनेट वर थोडंसं शोधल्यावर ओंकारने "नागटिब्बा ट्रेक" ची कल्पना सुचवलीनागटिब्बा एक प्रसिद्ध ट्रेकिंग स्थळ आहे जे उत्तराखंड राज्यातील टिहरी गढवाल जिल्ह्यात स्थित आहे. "नाग" म्हणजे सर्प आणि "टिब्बा" म्हणजे टेकडी, त्यामुळे याचा अर्थ "सर्पांची टेकडी" असा होतो. सुमारे 3,022 मीटर (9,915 फूट), जे गढवाल हिमालयातील कनिष्ठ हिमालय पर्वतरांगांमधील सर्वात उंच शिखर आहे. आम्ही जाणार होतो भर डिसेंबर मध्ये तर कदाचित बर्फ पण भेटेल म्हणुन मीही त्याच्या कल्पनेला तात्काळ पाठिंबा दिला – "बास! हाच ट्रेक करूया!" आणि प्लॅन फिक्स झाला.

बाकीचे मित्र महेश, एरिक, आणि राजेश यांना सुरुवातीला काही कल्पनाच नव्हती की आम्ही नेमकं कुठे चाललो आहोत. त्यांना फक्त एवढंच माहिती होतं की, "परीक्षा झाल्यावर मसुरी फिरायला जायचं आहे." बस्स!

तर ठरलं असं की – ओंकार पाच दिवस आधी देहरादूनला परीक्षा द्यायला जाणार, आणि मग आम्ही चारजण नंतर.

ओंकार ठरल्याप्रमाणे त्याच्या परीक्षेसाठी गेला. आम्ही चार दिवसांनी आमची ट्रेन पकडली. दिड दिवसांचा प्रवास मजेत पार पडला. डब्यामध्ये एक महिलांचा ग्रुप होता, तो सुद्धा मसुरी हरिद्वार फिरायला चालला होता. त्यांच्यावर आम्ही संस्कारी मुलं असल्याची छाप पडल्यामुळे आम्हाला जेवण्याच्या वेळी त्यांनी सोबत आणलेली भाकरी, ठेचा, चटणी असे पदार्थ भेटु लागले.

ट्रेन वेळेवर हरिद्वारला पोहचली. स्टेशनवरच एका सफाई कामगाराला विचारल तर त्याने आंघोळीची सोय करुन दिली. स्टेशनच्या बाहेर नाश्ता झाल्यावर दोन तीन ठिकाणी बरीच घासाघीस करुन इसमे और कुछ कम हो सकता है क्या महेशने बोलुन बोलुन तीन स्कुटी भाड्याने घेतल्या आणि निघालो देहरादुनला.

हरिद्वारवरुन देहरादून जेमतेम ४० किमी. एकतासात आम्ही ओंकार जिथे आमच्यासाठी वाट बघत उभा होता तिथे पोहचलो.  देहरादुनला ओंकारसोबत जेव्हा नजरानजर पडली तेव्हा १५०० किमी लांब मित्राला बघुन आमच्यातला एक जण अतिउत्साहात सरळ गाडीवरुनच गळाभेट करायला गेला. पण ही गळाभेट अचानक साष्टांग नमस्कार मध्ये कधी बदलली कळलंच नाही. हि भेट आम्ही कधीच विसरु शकणार नाही. ते बोलतात ना व्हॅाट हॅपन्स इन व्हेगास, स्टेज इन व्हेगास तसंच ते पण आमच्याबरोबर देहरादून मध्येच राहणार. मग आम्ही निघालो पंतवारीला जायला जे नागटिब्बा ट्रेकसाठीच पायथ्याच गाव होत. हा प्रवास ८०-९० किमी होता. पण देहरादून सोडताच आपण हिमालयाच्या कुशीत शिरतो. नागमोडी रस्ते गाडीचा वेग ३० च्यावर जाऊन देत नाही. पंतवारीला जाताना पहिल्यांदा लागलं ते म्हणजे मसुरी. मसुरी पर्यंत रस्त्यावर गाड्यांची वर्दळ होती. मसुरीहून बाहेर पडलो आणि समोरचं दृश्य हळूहळू बदलायला लागलं – गर्द झाडी, आणि दरीच्या बाजूला खूप खोल काळसर सावल्या.

रस्ता पूर्णपणे नागमोडी वळणांनी भरलेला. एका वळणावरून पुढचं काहीच दिसत नाही – वाटतं, जणू दर वळणामागे एक नवीन दृश्य आपली वाट पाहत आहे. एकीकडे खोल दरी, दुसरीकडे उंच डोंगर – आणि मधोमध आपण. थंडीचा शिरशिरी आणणारा अंगावरुन हलकेच स्पर्श. हातमोजे घातले होते तरीही आतमध्ये हात पुर्ण गारठलेले, नाकातून थंडीमुळे पाणी वाहतय. जाम वाट लागली होती. असच यमुनेच्या काठावरुन प्रवास करत करत जेव्हा शेवटी पंतवारी गावाचं फलक दिसलं, तेव्हा हायस वाटलं. तो पर्यंत सुर्य मावळतीला आला होता. म्हणून पंतवारी ते बेस कॅम्प हा ४-५ किमीचा ट्रेक आम्हाला आता गाडीनेच रस्त्याने जावं लागणार होत, आम्ही तिथे ३ वाजता पोहचणं अपेक्षित होत. पंतवरीला पोहचल्यावर पहिल्यांदा आम्ही गरम वाफाळलेला चहा घेतला आणि त्या बरोबर पार्लेजी.

थोडा आराम केल्यावर पुढच्या प्रवासाला निघालो. पंतवारी ते बेस कॅम्प ट्रेक जरी ४ किमी असला तरी रस्त्याने हा प्रवास १३-१४ किमीचा होता. आणि पुर्ण कच्चा रस्ता. धुळ उडवत अंधारात आमच्या गाड्या चालल्या. आता येईल नंतर येईल पण रस्ता काही संपत नव्हता. त्यात रस्त्याच्या मधोमध आम्हाला एक कोल्हा दिसला. कॅमेरामध्ये त्याला टिपेपर्यंत तो गायब झाला. एरिकला तर हा प्रवास १०० किमी पेक्षाही जास्त वाटला. साडेसहा वाजता आम्ही बेस कॅम्पला पोहचलो. गेल्या गेल्या आम्हाला नाश्ता दिला, परत चहा प्यायलो. थोडं टाईमपास करुन लगेचच जेवायला बसलो आणि नऊ वाजताच झोपी गेलो. पहाटे अडीच वाजता ट्रेक साठी उठायचं होत.

वेळेवर पहाटे उठल्यावर आधी कसबस थंड पाण्याने तोंड धुतल. तयार होऊन गरमागरम पोहे खाल्ले आणि साडेतीनच्या दरम्यान आम्ही निघालो. अंधारात आमचा ट्रेक सुरु झाला. रात्री इथे आलो तेव्हा वाटत होतं की इथे आम्ही फक्त पाच जण आणि आमच्या कॅम्पला असलेले अजुन चार असे नऊच जण आहोत पण आता दिसतय की ठिकठिकाणी इथे कॅम्प लागलेत आणि प्रत्येक कॅम्प मधुन दहा बारा जण असं करत करत पुर्ण जत्था निघालाय नागटिब्बाला. आमच्या जवळ टॅार्च नव्हती. मोबईल टॅार्चच्या प्रकाशात रस्ता कापत होतो. तसही सगळेच बरोबर चालत होते तर एकदमच गरज नव्हती. ट्रेक निवांत होता, एकदम अवघडही नव्हता. तसा हा ट्रेक नवशिक्यांसाठी तसेच अनुभवी ट्रेकर्ससाठीही योग्य आहे. चालायला रस्ता चांगला होता, कदाचित रोज रोज येजा करत मोठी पाऊलवाट झाली असावी. चालता चालता लक्षात आलं की महेश शांत शांत आहे आणि तो आमच्या बरोबर चालत नव्हता. विचारुन विचारुन थकलो काय झाल, अरे सांग काय झाल तर शेवटी कळाल की त्याच्या घोरण्यावरुन त्याला आम्ही चिडवल त्यामुळे तो फुग्गा झाला होता. बरीच समजुत काढली. समजुत काढता काढता अर्ध्याच्यावर ट्रेक पण कधी पुर्ण झाला समजल नाही पण शेवटी तो स्वतःच शांत झाला आणि लागला मस्ती करायला. 

अर्धा ट्रेक पुर्ण झाल्यावर दोन रस्ते आहेत, एक जातो नाग देवतेच्या मंदीराकडे, जेथे स्थानिक लोक आपल्या जनावरांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतात आणि एक शिखरावर. गाईडने आम्हाला सांगितलं की परत येताना मंदीराकडे जायच, आधी शिखर. आता खुप उभी चढ होती. थोडी दमछाक होत होती पण कठीण म्हणावी अशी नव्हती. चालताना वाटेत आम्हाला एके ठिकाणी दुरवर काहीतरी पांढर पांढर दिसल, मला वाटलं की असेल झाडातुन चांदणी प्रकाश पडलेला पण जवळ गेल्यावर कळल अरे हा तर बर्फ. एक आठवड्यापुर्वी इथे बर्फ पडुन गेला होता तर थोडाफार कोपऱ्यात जो वितळला नव्हता तो शिल्लक होता. 

साडेसहा वाजता, जवळपास तीन तासांची तंगडतोड केल्यावर आम्हाला दुरूनच नागटिब्बाचा त्रिशूळ दिसला. चला पोहचलो, पोहचलो आपण. संधी प्रकाशही आता पडायला सुरुवात झाली होती. एकदम शिखरावर झपाझप पावलं टाकत आलो. दुरवर पांढरी शाल ओढुन बसलेले हिमाच्छदित पर्वत दिसायला लागले. आम्हाला ही आता शाल, गोधडी जे काय भेटेल ते ओढुन बसु वाटत होत. एवढी भयानक थंडी. आम्ही सर्व एवढे पॅक होतो तरीही कुडकुडत होतो. फोटो काढण्यासाठी हातमोजे जरी काढले तरी हात गार पडायचे.

तशीच ती थंडी सहन करत तिथे जागा पकडुन बसलो. जशी-जशी वेळ पुढे सरकत गेली, तशी आकाशात सुरुवातीला एक हलकी नारिंगी रेषा उमटू लागली. पक्ष्यांची किरकिर, शांत वारा आणि श्वासांमधली वाफ – सगळं वातावरण जणू काही त्या एका क्षणासाठी थांबून होतं.

मग एक चमकती सोनसळी धार आकाश फाडत वर आली. तो क्षण इतका सुंदर होता की काही क्षण सगळे शब्द हरवले – फक्त नजर होती समोरच्या त्या रोषणाईवर, जी हळूहळू संपूर्ण पर्वतरांगांवर पसरत होती.

दूरवर इतर हिमालयीन शिखरं सुद्धा सूर्यप्रकाशात न्हाऊन गेली होती – जणू स्वर्गातलं कोणतं तरी दरवाजंच उघडलं होतं. त्या क्षणाला काहीच नकोसं वाटतं – ना फोन, ना गॅझेट्स, ना बोलणं. फक्त एक शांत मन आणि त्या "सूर्याच्या दर्शनाची" अनुभूती. नागटिब्बा शिखरावरचा सूर्योदय म्हणजे एका छोट्याशा ट्रेकरला मिळालेली हिमालयाचा आशीर्वाद.

एक विलक्षण रोमांच आम्ही अनुभवला. अजुनही हात बाहेर काढायचे म्हणजे जीवावर येत होत. पण त्याच परिस्थितीत फोटो विडीयो काढले. एक दोन रील बघुन ठेवले होते, ते शुट केले. आता आजुबाजुचे पर्वत मस्त सुर्यप्रकाशात उठुन दिसु लागले. ती वेळ छान अनुभवुन आम्ही निघालो. वाटेत जो काही बर्फ शिल्लक होता तेवढ्यामध्ये आम्ही खुप मजा केली. आणि आमचा परतीचा ट्रेक सुरू केला. खरंच सांगायचं तर, यावेळी आम्ही अक्षरशः उडतच आलो!

परत बेस कॅम्पला पोहचुन फ्रेश झालो. सकाळी जे थंडीने गारठलो होतो तेच आता गरम वाटु लागलं होत. तेवढ्यात स्वयंपाक तयार झाला. जेवण खरंच जबरदस्त होतं – गरम गरम राजमा, भात. हिमालयाच्या कुशीत हे सगळ्यात स्वादिष्ट जेवण वाटलं.

पोट भरल्यावर, आठवणींचं ओझं आणि समाधानाचा भार घेऊन आम्ही मसुरीच्या दिशेने रवाना झालो. एक टप्पा पूर्ण झाला होता, पण त्याच्याशी जोडलेल्या भावना मात्र अजून मनात घोळत होत्या. आता मन शांत करायचं होतं – कारण हिमालयाने आमचं मन हलवलं होतं... आता त्याला शांतपणे बसून मनात साठवायचं होतं.