Sunday, 15 June 2025

मृगगड - गोकुंड आणि भरपुर ॲडवेंचर

मृगगड – रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातला पालीजवळचा एक लपलेल रत्न. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा छोटेखानी किल्ला फारसा प्रसिद्ध नाही, पण निसर्गसौंदर्य, शांतता, आणि थोडीशी साहसाची जोड अशा सगळ्याचा परिपूर्ण संगम इथे अनुभवता येतो. कार्तलाबखान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंबरखिंडीच्या लढाईत ह्या किल्ल्याचा विशेष उपयोग झाला असेल तरीही जास्त इतिहास माहीत नाही. गर्दी नसलेला, पण इतिहासाचा व निसर्गाचा स्पर्श लाभलेला असा मृगगड एकदा तरी ट्रेकर्सनी अनुभवायलाच हवा.

या ट्रेकचा अनुभव मी घेतला एप्रिल महिन्यात – उन्हाळा असूनसुद्धा सावलीचं जंगल, आणि वर असलेली एक शांत गुहा यामुळे हा ट्रेक वेगळाच वाटला...

उन्हाळ्याचा तडाखा वाढत होता, पण काही झाल तरी दर महिन्याला एक गड सर करायचाच हा माझा संकल्प. मृगगड बऱ्याच दिवसांपासून डोक्यात घर करून बसला होता, आणि वाचण्यात आलं होतं की हा छोटासाच आणि सोपा ट्रेक आहे. मुख्य म्हणजे त्याच बाजुला माझ्या मेव्हण्याचा विजयचा विला आहे. गडाच्या पायथ्याच गाव भेलीव, विला पासुन अगदी १४ किमीवर! ठरलं तर मग. शनिवारी रात्री विल्यावर मुक्काम आणि रविवारी सकाळी मृगगड.

आदल्या दिवशी दुपारीच मी, माझी दोन पिल्लं (रिआ आणि रेयांश), माझा मित्र महेश आणि त्याची बायको कोमल निघालो. वाटेत कळंबोलीला आधी सासुरवाडीला जाऊन मेव्हण्याने विलावर घेऊन जाण्यासाठी सामान भरुन ठेवलं होतं ते घेतल. विजय नंतर येणार होता. खोपोलीच्या पुढे रस्त्यात तावडे वडापाववाल्याकडे गरमागरम वडापाव खाल्ले आणि संध्याकाळी परत भुक लागलीच तर, काहीतरी असावं म्हणुन भेळ बांधुन घेतली. विला गाठल्यावर आम्ही स्विमिंगपुल मध्ये उतरलो पण पाणी तर आंघोळीच्या पाण्याइतक गरम. तसच त्या पाण्यात मस्ती केल्यावर बाहेर आलो.आता एवढ पाण्यात खेळलो आणि सकाळी सवयीप्रमाणे व्यायामासाठी लवकर उठलेलो तर मग दिली ताणून.

संध्याकाळी प्रथमेश-रुपाली आणि त्यांची मुलगी ध्रुवी, सागर आणि अरविंद विला वर पोहोचले. विजय ही मागोमाग आला. सगळे गोळा झाल्यावर, रात्रीच जेवणं झाली आणि मग पत्त्यांची मैफल रंगली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचं असल्यामुळे शेवटी पत्ते बाजूला ठेवून आम्ही सगळे झोपलो नाहीतर रात्रभर काहीतरी धांगडधिंगा करत बसलो असतो.

या ट्रेकचा लीडर असल्यामुळे सकाळी सर्वांत आधी उठायची जबाबदारी अर्थातच माझी! अलार्म लावलेलाच होता पण तो वाजयच्या आधीच डोळे उघडले, वेळेकडे पाहिलं, अरे आता १५ मिनिटात अलार्म वाजेलच तर मग काहीस मनातल्यामनात गणित करुन अलार्मची वेळ थोडी पुढं ढकलली आणि झोपलो. अलार्म वाजला, आता उठायलाच लागेल! मी पटकन आवरलं आणि मग सुरू झाली सगळ्यांना उठवण्याची मोहीम. कोण अंग झटकत उठलं, कोण अरे थांब, त्याच आवरुन झाल की मी उठतो, प्रथमेशला उठल्यावर योगासन करायची सवय आहे हे कळल, आणि त्यात शवासन त्याच आवडतं आसन – पण शेवटी सगळे एक एक करत उठले आणि तयारी सुरू झाली. मी चहा टाकला, सगळ्यांनी चहा बरोबर बिस्किट खाल्ली!  

निघताना मात्र भन्नाट मजा . कोणी काय घ्यायचं, कोणाचं काय राहिलंय, पाण्याच्या बाटल्या कोण घेणार यावर विशेष वाद झाला – “बॅग जड होते”, “मी दोन पाण्याच्या बाटल्या घेतल्यात”, “मी खाणं घेतलंय” अशा टोलवाटोलवीच्या डायलॉग्स हवेत उडत होते. शेवटी माझ्याच बॅग मध्ये सर्वात जास्त सामान आलं पण आता काय करणार, लीडर ह्या नात्याने माझ कर्तव्यच होत ते (माझा ब्लॅाग आहे तर मीच हिरो).

गेटच्या बाहेर आलो तर गाडीची चावीच सापडत नव्हती. सगळ्यांना माझ्यावर उखडायची आयतीच संधी चालून आली. चावी शेवटी होती कुठे तर माझ्या खिशात. काखेत कळसा आणि …..  मृगगडच्या दिशेने निघालो. ठरवूनही आमचा नेहमीचा 'एक तास उशीर'चा ट्रॅडिशन सुरूच राहिला. अर्ध्या तासात आम्ही ‘भेलीव’ ह्या पायथ्याच्या गावात पोहोचलो – हेच मृगगडाच्या पायथ्याचं गाव.  गुगल मॅपचा थोडा उपयोग झाला, पण रस्त्यात स्थानिंकानाही विचारत विचारतच आलो.  एक स्कुटी वरुन जाणाऱ्याने तर गावापर्यंतच आणुन सोडल. गाव तसं छोटंसं आहे, गावात शिरल्या शिरल्या एक भल मोठ मंदीर दिसल तिथेच पार्किंगला ऐसपैस जागा होती.

गाडी पार्क केली तिथूनच मृगगडाचं पहिलं दर्शन झालं. फार उंचावर नव्हता, पण डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या दाट जंगलामुळे त्याचं सौंदर्य अधिकच उठून दिसत होतं. पाठीमागे लोणावळ्याचे भलेमोठे डोंगर त्याला साक्षीला होते – एकदम रुबाबात उभा होता.

गावात अजून फारशी हालचाल सुरू झाली नव्हती. नाश्त्याची कुठेच सोय नव्हती, त्यामुळे लगेचच ट्रेक सुरू केला. सुरुवात कुठुन करायची हे एकाला विचारल – त्याने वाट दाखवली, आणि मग आम्ही ती पायवाट पकडून पुढे निघालो.

सुरुवातीची पाच मिनिटं शेतातून चालत गेलो. नंतर अचानक जंगलात प्रवेश झाला – छान सावली आणि समोर सपाट चाल. वाटेत गप्पा, फोटो आणि विडीयो शुटींग चालू होतीच. जंगलात सर्वत्र करवंदाची जाळी पसरलेली होती – काही टपोरे करवंदं दिसली पण कच्चीच होती.

सुमारे दहा पंधरा मिनिटे चालल्यावर चढ सुरू झाला, पण सुरुवातीचा टप्पा फारसा कठीण नव्हता. मग आलो आम्ही मृगगडाच्या पहिल्या खऱ्या ॲडवेंचरवर – चढाईचा मुख्य टप्पा! दोन्ही बाजूंनी उंच कातळ आणि मधून जाणारी अगदीच अरुंद वाट. मदतीसाठी काही दुर्गप्रेमींनी आधीच दोर लावून ठेवले होते – त्याची मदत घेऊन चढणं थोडं सोपं झालं. ही वाट इतकी निमुळती होती की एखादं पोटसुटलेलं प्रकरण तिथे अडकलं असतं. चेष्टा-मस्करी करत आणि दोर पकडत शेवटी आम्ही वर पोहोचलो!

कातळ खिंड चढून वर गेल्यावर दोन वाटा समोर आल्या. एक वाट सरळ मृगगडावर नेणारी होती — जिथे कातळातच कोरलेल्या जुन्या पायऱ्या दिसत होत्या. दुसरी वाट मात्र थोडी वेगळी होती, आणि किल्ल्याच दुसर ॲडवेंचर — मृगगडाची गुहा!

ह्या गुहेकडे जाणारी वाट अतिशय अरुंद होती — इतकी की एकावेळी माणसाचा एकच पाय ठेवायला जागा एवढीच रुंदी. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. आधी मी आणि महेशने तिकडे जायचं ठरवलं. आम्हाला अजिबात अवघड वाटलं नाही — जेमतेम ३०-४० मीटरची वाट होती. गुहा मात्र कमालच होती! त्यामुळे लगेच परत आलो आणि रिआ व रेयांशलाही तिकडे घेऊन गेलो. बाकीच्यांना पण बोललो चला पण आधीच्याच ॲडवेंचरने थकल्यामुळे सगळे तिथेच विसावलेले होते! नंतर महेश कोमलला घेऊन गेला.

गुहेतून परत आल्यावर, आम्ही तिघांनी (मी, महेश आणि रेयांश) आमचं खास "बेअरचेस्ट फोटोशूट" चालू केलं — झाडाला लटकून, पुलअप्स करत, आणि बरंच काही माकडचाळे. बाकीचे वैतागले आणि पुढे निघून गेले. फक्त अरविंद थांबला — कारण फोटो तोच काढत होता, त्याला पर्याय नव्हता.

मनसोक्त फोटोशूट झाल्यावर आम्ही पायऱ्यांनी वर आलो. पायऱ्या संपतात तिथे एक छोटेखानी मंदिर आहे. पुढे गेल्यावर पाण्याची काही टाकी दिसली — पण त्या पूर्ण सुकलेल्या होत्या. अजून थोडं चालल्यावर आम्ही पोचलो किल्ल्याच्या शेवटच्या टोकावर. आम्ही गुहेपाशी टाइमपास करत असताना एक ट्रेकिंग ग्रुप आम्हाला ओव्हरटेक करून किल्ला बघून परत निघालाही होता. 

नाश्ता अजूनही झाला नव्हता, आणि भूक जोरात लागली होती. मग काय – बॅगेत जे जे होतं ते बाहेर आल. चिक्की, संत्री, खाकरा, चॉकलेट्स... सगळ्यांनी पोटभर खाल्लं. थोडी तरतरी आली आणि पुन्हा फोटोशूटला सुरुवात झाली!

महेश – आमचा कॅलेस्थॅनिक्स एक्सपर्ट – त्याच्या अॅक्शनला सुरुवात झाली. रेयांशचा आग्रह होता, “महेश काका बॅकफ्लिप मार!” मग महेशने थोडा वॉर्मअप करून बॅकफ्लिप, हँडस्टँड, लेग स्प्लिट सगळं करून दाखवलं. आणि मग रेयांशही मागे कसा राहील? त्यानेही कार्टव्हील मारून दाखवलं!

सगळे स्टंट्स आणि धमाल झाल्यावर परतीला निघालो. मनात होतं की आता पटापट खाली उतरू… पण कुठं काय! त्या निमुळत्या खिंडीत सगळ्यांचा एक ग्रुप फोटो काढायचा होता. त्या एक परफेक्ट शॉटसाठी सगळ्यांना एका रेषेत उभं करण्यात बराच वेळ गेला.

खाली जंगलात आल्यावर रुपालीने सगळी कच्ची करवंद गोळा करायला लावली, त्याची चटणी बनते, अजुनही मला मिळाली नाही. परत पार्किंग लॅाटला पोहचलो तेव्हा खरंच जाम थकलेलो होतो. गुहेचा ट्रेल, चढ-उतार, ऊन आणि उत्साह सगळ्यामुळे शरीर आणि मन दोन्ही दमलं होतं. थोडसं फ्रेश झालो, पाणी प्यायलो आणि मी मनातल्या मनात ठरवलेला प्लॅन पुढे सरकवला — "सेक्रेट वॉटरफॉल!"

त्यालाच गोकुंड वॅाटरफॅाल ही बोलतात. आमच्याकडे पार्किंगचे पैसे घ्यायला आलेल्या गावकऱ्यालाच तिकडे जायचा रस्ता विचारला. त्याच्यासाठी फक्त चार किमी अंतरावर असलेल फल्याण गावी जायच. पण तिथं पोहचलो आणि बघतो तर काय — ४-५ मोठ्या टुरिस्टच्या बसेस आणि बरीच खाजगी वाहने आधीपासूनच उभ्या! सेक्रेट काही उरलं नव्हतं! गावकऱ्यांनी आमच्या बरोबर असणाऱ्या मुलांना बघुन सांगितलं, “गोकुंड तर लांब आहे, पण वाटेतच जवळ एक छान ठिकाण आहे. तिथे मुलांना मजा येईल.”

अर्धा तास चाललो, वाट मोकळीच, एवढ्या गाड्या-बसेस होत्या पण त्यातला एक माणुस दिसत नव्हता, बरोबर चाललोय का आम्ही का चुकलो वाट. ऊन तापलेलं, आम्ही थकलेलो, तरी मनात होती थोडी उमेद. तेवढ्यात एक आशेचा किरण — नदी दिसली! एक ग्रुप पण आला. त्यांनी सांगितलं, "फक्त पाच मिनिटं पुढे जा — धमाल स्पॉट आहे!" आता एवढं आलोच आहोत तर तेही बघूया म्हणत पुढे गेलो. तर खरंच एकदम मस्त जागा होती. वाहत्या पाण्यात जेमतेम अंगभर पाण्याच एक डबक होत, पोहण्यासाठी मस्तच, पाणी पण थंड,  सभोवताली शांतता. पटापट कपडे काढले आणि पाण्यात उड्या मारल्या. गरम झालेल्या अंगावर ते थंडगार पाणी म्हणजे जणू स्वर्गसुखच!

रेयांशने तर अंडरवॉटर स्टंट्स, उड्या मारत धमाल केली. शेवटचा ॲडवेंचर म्हणजे सागरचा चष्मा पाण्यात बुडाला आणि मग सुरू झाली ती 'चष्मा शोध मोहीम'! शेवटी महेशला सापडला. सगळ्यांनी मनसोक्त खेळून घेतलं. आता मात्र वेळ होती परतीची. अर्धा तास परत चालून गाडीजवळ पोहोचलो तेव्हा "हायसं वाटलं" म्हणणं म्हणजे थोडं होतं! मग विला गाठला, गरमागरम जेवणावर ताव मारला आणि एक आंघोळ घेऊन परतीचा प्रवास सुरू केला...

ही ट्रिप खासच होती — थोडा थकवा, थोडं चुकणं, आणि खूप सारा आनंद! 



Sunday, 25 May 2025

थांब... श्वास घे... आणि जग : हिमालयात एक दिवस

हिमालय म्हणजे पृथ्वीवरचं एक जिवंत चमत्कार. जगातील सर्वात उंच पर्वतरांग – जिथं एव्हरेस्टकांचनजंगानंदा देवी, आणि केदारनाथबद्रीनाथ यांसारखी धार्मिक स्थळं विसावलेली आहेत. हे केवळ डोंगर नव्हेत – ह्या शिखरांमध्ये देवत्वाचं वास्तव्य आहे, असं मानलं जातं.

हिमालय म्हणजे निसर्गाची सर्वात भव्य, पण तरीही नम्र रचना – जिच्यासमोर उभं राहिलं की मनात एकच भावना उरते – "आपण किती लहान आहोत!" आणि नागटिब्बा हे या महान हिमालयाचंच एक कोवळं, शांत, पण भारदस्त अंग आहे – जिथं आपण थोडं स्वतःपासून दूर जाऊन, पुन्हा स्वतःकडे परत येतो. जणू हिमालय आपल्याला शांतपणे सांगतो की, "थांब… श्वास घे… आणि जग!"

आमचा मित्र ओंकार याची देहरादुनला डिसेंबर मध्ये परीक्षा होती. डिसेंबर तसं थोडंसं आरामाचा आणि सुट्टीचा महिना. म्हणुन आम्ही विचार केला की आपण पण जाऊ ओंकार बरोबर आणि ओंकारची परीक्षा झाली की लगेच तिथेच आजूबाजूला कुठेतरी छोटी बजेट ट्रिप करू. इंटरनेट वर थोडंसं शोधल्यावर ओंकारने "नागटिब्बा ट्रेक" ची कल्पना सुचवलीनागटिब्बा एक प्रसिद्ध ट्रेकिंग स्थळ आहे जे उत्तराखंड राज्यातील टिहरी गढवाल जिल्ह्यात स्थित आहे. "नाग" म्हणजे सर्प आणि "टिब्बा" म्हणजे टेकडी, त्यामुळे याचा अर्थ "सर्पांची टेकडी" असा होतो. सुमारे 3,022 मीटर (9,915 फूट), जे गढवाल हिमालयातील कनिष्ठ हिमालय पर्वतरांगांमधील सर्वात उंच शिखर आहे. आम्ही जाणार होतो भर डिसेंबर मध्ये तर कदाचित बर्फ पण भेटेल म्हणुन मीही त्याच्या कल्पनेला तात्काळ पाठिंबा दिला – "बास! हाच ट्रेक करूया!" आणि प्लॅन फिक्स झाला.

बाकीचे मित्र महेश, एरिक, आणि राजेश यांना सुरुवातीला काही कल्पनाच नव्हती की आम्ही नेमकं कुठे चाललो आहोत. त्यांना फक्त एवढंच माहिती होतं की, "परीक्षा झाल्यावर मसुरी फिरायला जायचं आहे." बस्स!

तर ठरलं असं की – ओंकार पाच दिवस आधी देहरादूनला परीक्षा द्यायला जाणार, आणि मग आम्ही चारजण नंतर.

ओंकार ठरल्याप्रमाणे त्याच्या परीक्षेसाठी गेला. आम्ही चार दिवसांनी आमची ट्रेन पकडली. दिड दिवसांचा प्रवास मजेत पार पडला. डब्यामध्ये एक महिलांचा ग्रुप होता, तो सुद्धा मसुरी हरिद्वार फिरायला चालला होता. त्यांच्यावर आम्ही संस्कारी मुलं असल्याची छाप पडल्यामुळे आम्हाला जेवण्याच्या वेळी त्यांनी सोबत आणलेली भाकरी, ठेचा, चटणी असे पदार्थ भेटु लागले.

ट्रेन वेळेवर हरिद्वारला पोहचली. स्टेशनवरच एका सफाई कामगाराला विचारल तर त्याने आंघोळीची सोय करुन दिली. स्टेशनच्या बाहेर नाश्ता झाल्यावर दोन तीन ठिकाणी बरीच घासाघीस करुन इसमे और कुछ कम हो सकता है क्या महेशने बोलुन बोलुन तीन स्कुटी भाड्याने घेतल्या आणि निघालो देहरादुनला.

हरिद्वारवरुन देहरादून जेमतेम ४० किमी. एकतासात आम्ही ओंकार जिथे आमच्यासाठी वाट बघत उभा होता तिथे पोहचलो.  देहरादुनला ओंकारसोबत जेव्हा नजरानजर पडली तेव्हा १५०० किमी लांब मित्राला बघुन आमच्यातला एक जण अतिउत्साहात सरळ गाडीवरुनच गळाभेट करायला गेला. पण ही गळाभेट अचानक साष्टांग नमस्कार मध्ये कधी बदलली कळलंच नाही. हि भेट आम्ही कधीच विसरु शकणार नाही. ते बोलतात ना व्हॅाट हॅपन्स इन व्हेगास, स्टेज इन व्हेगास तसंच ते पण आमच्याबरोबर देहरादून मध्येच राहणार. मग आम्ही निघालो पंतवारीला जायला जे नागटिब्बा ट्रेकसाठीच पायथ्याच गाव होत. हा प्रवास ८०-९० किमी होता. पण देहरादून सोडताच आपण हिमालयाच्या कुशीत शिरतो. नागमोडी रस्ते गाडीचा वेग ३० च्यावर जाऊन देत नाही. पंतवारीला जाताना पहिल्यांदा लागलं ते म्हणजे मसुरी. मसुरी पर्यंत रस्त्यावर गाड्यांची वर्दळ होती. मसुरीहून बाहेर पडलो आणि समोरचं दृश्य हळूहळू बदलायला लागलं – गर्द झाडी, आणि दरीच्या बाजूला खूप खोल काळसर सावल्या.

रस्ता पूर्णपणे नागमोडी वळणांनी भरलेला. एका वळणावरून पुढचं काहीच दिसत नाही – वाटतं, जणू दर वळणामागे एक नवीन दृश्य आपली वाट पाहत आहे. एकीकडे खोल दरी, दुसरीकडे उंच डोंगर – आणि मधोमध आपण. थंडीचा शिरशिरी आणणारा अंगावरुन हलकेच स्पर्श. हातमोजे घातले होते तरीही आतमध्ये हात पुर्ण गारठलेले, नाकातून थंडीमुळे पाणी वाहतय. जाम वाट लागली होती. असच यमुनेच्या काठावरुन प्रवास करत करत जेव्हा शेवटी पंतवारी गावाचं फलक दिसलं, तेव्हा हायस वाटलं. तो पर्यंत सुर्य मावळतीला आला होता. म्हणून पंतवारी ते बेस कॅम्प हा ४-५ किमीचा ट्रेक आम्हाला आता गाडीनेच रस्त्याने जावं लागणार होत, आम्ही तिथे ३ वाजता पोहचणं अपेक्षित होत. पंतवरीला पोहचल्यावर पहिल्यांदा आम्ही गरम वाफाळलेला चहा घेतला आणि त्या बरोबर पार्लेजी.

थोडा आराम केल्यावर पुढच्या प्रवासाला निघालो. पंतवारी ते बेस कॅम्प ट्रेक जरी ४ किमी असला तरी रस्त्याने हा प्रवास १३-१४ किमीचा होता. आणि पुर्ण कच्चा रस्ता. धुळ उडवत अंधारात आमच्या गाड्या चालल्या. आता येईल नंतर येईल पण रस्ता काही संपत नव्हता. त्यात रस्त्याच्या मधोमध आम्हाला एक कोल्हा दिसला. कॅमेरामध्ये त्याला टिपेपर्यंत तो गायब झाला. एरिकला तर हा प्रवास १०० किमी पेक्षाही जास्त वाटला. साडेसहा वाजता आम्ही बेस कॅम्पला पोहचलो. गेल्या गेल्या आम्हाला नाश्ता दिला, परत चहा प्यायलो. थोडं टाईमपास करुन लगेचच जेवायला बसलो आणि नऊ वाजताच झोपी गेलो. पहाटे अडीच वाजता ट्रेक साठी उठायचं होत.

वेळेवर पहाटे उठल्यावर आधी कसबस थंड पाण्याने तोंड धुतल. तयार होऊन गरमागरम पोहे खाल्ले आणि साडेतीनच्या दरम्यान आम्ही निघालो. अंधारात आमचा ट्रेक सुरु झाला. रात्री इथे आलो तेव्हा वाटत होतं की इथे आम्ही फक्त पाच जण आणि आमच्या कॅम्पला असलेले अजुन चार असे नऊच जण आहोत पण आता दिसतय की ठिकठिकाणी इथे कॅम्प लागलेत आणि प्रत्येक कॅम्प मधुन दहा बारा जण असं करत करत पुर्ण जत्था निघालाय नागटिब्बाला. आमच्या जवळ टॅार्च नव्हती. मोबईल टॅार्चच्या प्रकाशात रस्ता कापत होतो. तसही सगळेच बरोबर चालत होते तर एकदमच गरज नव्हती. ट्रेक निवांत होता, एकदम अवघडही नव्हता. तसा हा ट्रेक नवशिक्यांसाठी तसेच अनुभवी ट्रेकर्ससाठीही योग्य आहे. चालायला रस्ता चांगला होता, कदाचित रोज रोज येजा करत मोठी पाऊलवाट झाली असावी. चालता चालता लक्षात आलं की महेश शांत शांत आहे आणि तो आमच्या बरोबर चालत नव्हता. विचारुन विचारुन थकलो काय झाल, अरे सांग काय झाल तर शेवटी कळाल की त्याच्या घोरण्यावरुन त्याला आम्ही चिडवल त्यामुळे तो फुग्गा झाला होता. बरीच समजुत काढली. समजुत काढता काढता अर्ध्याच्यावर ट्रेक पण कधी पुर्ण झाला समजल नाही पण शेवटी तो स्वतःच शांत झाला आणि लागला मस्ती करायला. 

अर्धा ट्रेक पुर्ण झाल्यावर दोन रस्ते आहेत, एक जातो नाग देवतेच्या मंदीराकडे, जेथे स्थानिक लोक आपल्या जनावरांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतात आणि एक शिखरावर. गाईडने आम्हाला सांगितलं की परत येताना मंदीराकडे जायच, आधी शिखर. आता खुप उभी चढ होती. थोडी दमछाक होत होती पण कठीण म्हणावी अशी नव्हती. चालताना वाटेत आम्हाला एके ठिकाणी दुरवर काहीतरी पांढर पांढर दिसल, मला वाटलं की असेल झाडातुन चांदणी प्रकाश पडलेला पण जवळ गेल्यावर कळल अरे हा तर बर्फ. एक आठवड्यापुर्वी इथे बर्फ पडुन गेला होता तर थोडाफार कोपऱ्यात जो वितळला नव्हता तो शिल्लक होता. 

साडेसहा वाजता, जवळपास तीन तासांची तंगडतोड केल्यावर आम्हाला दुरूनच नागटिब्बाचा त्रिशूळ दिसला. चला पोहचलो, पोहचलो आपण. संधी प्रकाशही आता पडायला सुरुवात झाली होती. एकदम शिखरावर झपाझप पावलं टाकत आलो. दुरवर पांढरी शाल ओढुन बसलेले हिमाच्छदित पर्वत दिसायला लागले. आम्हाला ही आता शाल, गोधडी जे काय भेटेल ते ओढुन बसु वाटत होत. एवढी भयानक थंडी. आम्ही सर्व एवढे पॅक होतो तरीही कुडकुडत होतो. फोटो काढण्यासाठी हातमोजे जरी काढले तरी हात गार पडायचे.

तशीच ती थंडी सहन करत तिथे जागा पकडुन बसलो. जशी-जशी वेळ पुढे सरकत गेली, तशी आकाशात सुरुवातीला एक हलकी नारिंगी रेषा उमटू लागली. पक्ष्यांची किरकिर, शांत वारा आणि श्वासांमधली वाफ – सगळं वातावरण जणू काही त्या एका क्षणासाठी थांबून होतं.

मग एक चमकती सोनसळी धार आकाश फाडत वर आली. तो क्षण इतका सुंदर होता की काही क्षण सगळे शब्द हरवले – फक्त नजर होती समोरच्या त्या रोषणाईवर, जी हळूहळू संपूर्ण पर्वतरांगांवर पसरत होती.

दूरवर इतर हिमालयीन शिखरं सुद्धा सूर्यप्रकाशात न्हाऊन गेली होती – जणू स्वर्गातलं कोणतं तरी दरवाजंच उघडलं होतं. त्या क्षणाला काहीच नकोसं वाटतं – ना फोन, ना गॅझेट्स, ना बोलणं. फक्त एक शांत मन आणि त्या "सूर्याच्या दर्शनाची" अनुभूती. नागटिब्बा शिखरावरचा सूर्योदय म्हणजे एका छोट्याशा ट्रेकरला मिळालेली हिमालयाचा आशीर्वाद.

एक विलक्षण रोमांच आम्ही अनुभवला. अजुनही हात बाहेर काढायचे म्हणजे जीवावर येत होत. पण त्याच परिस्थितीत फोटो विडीयो काढले. एक दोन रील बघुन ठेवले होते, ते शुट केले. आता आजुबाजुचे पर्वत मस्त सुर्यप्रकाशात उठुन दिसु लागले. ती वेळ छान अनुभवुन आम्ही निघालो. वाटेत जो काही बर्फ शिल्लक होता तेवढ्यामध्ये आम्ही खुप मजा केली. आणि आमचा परतीचा ट्रेक सुरू केला. खरंच सांगायचं तर, यावेळी आम्ही अक्षरशः उडतच आलो!

परत बेस कॅम्पला पोहचुन फ्रेश झालो. सकाळी जे थंडीने गारठलो होतो तेच आता गरम वाटु लागलं होत. तेवढ्यात स्वयंपाक तयार झाला. जेवण खरंच जबरदस्त होतं – गरम गरम राजमा, भात. हिमालयाच्या कुशीत हे सगळ्यात स्वादिष्ट जेवण वाटलं.

पोट भरल्यावर, आठवणींचं ओझं आणि समाधानाचा भार घेऊन आम्ही मसुरीच्या दिशेने रवाना झालो. एक टप्पा पूर्ण झाला होता, पण त्याच्याशी जोडलेल्या भावना मात्र अजून मनात घोळत होत्या. आता मन शांत करायचं होतं – कारण हिमालयाने आमचं मन हलवलं होतं... आता त्याला शांतपणे बसून मनात साठवायचं होतं.

Saturday, 8 March 2025

वाढदिवशी सायकलची १०० किमीची रपेट

 ह्या वाढदिवसाला काही तरी वेगळ करायचा मी विचार केला. काय कराव, काय कराव सुचत नव्हत. एकतर मी घरी एकटा होतो कारण घरचे गेले होते पंढरपूरला आणि सोमवार येत असल्यामुळे मित्र कामावर. शेवटी एक कल्पना सुचली आणि पक्की केली. महडच्या वरदविनायकाला जायचं आणि ते म्हणजे सायकल वरुन. ५० किमी एका बाजुने.

पहाटे चार वाजताच उठलो. आवरुन साडेचारला सायकल वर टांग मारली. नाही नाही, सायकल वर बसलो, मला टांग मारुन बसता येत नाही. सोसायटीच्या बाहेर निघताना, सोसायटी मंदीरातल्या गणपतीला प्रार्थना केली, सुखरूप परत आण, तुलाच भेटायला येतोय. रनकिपर नावाचा एक ॲप आहे तो चालु केला. १-१ किमी झाला की तो सांगायचा. पुढे जेएनपीटीच्या रस्त्यावर आल्यावर ट्रेलर्सची वर्दळ वाढली. निवांत कडेकडेने सायकल पुढे नेत होतो. त्या ट्रेलर्सच्या आवाजामुळे ॲपचा आवाज यायचा नाही पण अचानक शांततेत जेव्हा आवाज यायचा तेव्हा कळायचं अरे वा ३-४ किमी झाले. 

जवळपास सव्वातासाने मी पळस्पे फाट्याजवळ पोहचलो. अजुन उजाडायच होत आणि उत्साह पण होता. २१ किमी झाले होते. न थांबताच प्रवास सुरु ठेवला. शेडुंग फाटा ओलांडल्यावर मात्र एक मनातली भीती खरी झाली. रस्त्याची कडेची बाजु अचानक खाली गेली, डांबरीकरण करुन करुन त्याच्या थरामुळे एक भाग वर. सायकल आवरेपर्यंत तोल जाऊन मी गुडघ्यांवर आपटलो. वेग तसा नियंत्रणात होता त्यामुळे हळूच पडलो पण गुडघ्याला लागल हे जाणवत होत. अंधारात बघता ही आल नाही नक्की किती लागलंय. दोन मिनिट थांबलो, एक घोट पाण्याचा घेतला आणि आता माघार नाही स्वतःला बोलुन पुढे निघालो.

चौकच्या पुढे आल्यावर पुढे आता उजाडायला लागलं होतं. अजुन १२ किमीचा प्रवास बाकी होता. पाच मिनिटाची विश्रांती घेतली कारण सायकलची सीट खुपच त्रास द्यायला लागली होती. बसायलाच जमत नव्हत. पुढचा प्रवास सतत ढुंगणं थोडंसं सीटवर मागे पुढे करुन, कधी कधी उभ राहुनच पेडल मारत मारत चालु ठेवला आणि त्यात आता बरेच चढ उतरणीचे रस्ते. चढाला सायकल लागली की वाटायच का आलोय मी, का करतोय मी. सरळ गाडीने का नाही आलो. उतरण लागल्यावर हायस वाटायच. ६ किमी राहीले तेव्हा परत एक विश्रांती घेतली. आता सुर्य पुढच्या डोंगररांगातुन वर आला होता. आता पुढचा थांबा मंदीरच. ४४ किमी पार केलेत आता ६ किमी काय आहे त्या समोर. महडचा फाटा आला आणि एकदम आनंदाची लहर संचारली. तिथुन पाच मिनीटात सायकल मंदीर. साडेसात वाजता मी पोहचलो. बरोबर तीन तास लागले. सायकल मंदीरासमोरच लावली आणि दर्शनासाठी आत गेलो.

मंदीरात मोजून ३-४ जण. गाभाऱ्यात फक्त पुजारी. वाढदिवसाच्या दिवशी एवढ छान दर्शन. धक्काबुक्की नाही, मोठी रांग नाही, गाभाऱ्यातुन बाहेर पडण्यासाठी रेटारेटी नाही. पाच मिनिटे मी गाभाऱ्यात एकटक वरदविनायकाकडे बघत उभा होतो. पुढे बाहेर येऊन बाप्पासमोर परत बसलो. मनसोक्त दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालुन बाहेर आलो. आता जाम भुक लागली होती. तिथे मंदीराबाहेर एक महिलांचा ग्रुप होता. त्यांनी फोटो साठी विनंती केली. त्यांचे फोटो काढुन मी माझ्या महडच्या नेहमीच्या ठरलेल्या हॅाटेलात आलो. मिसळपाव, वडापाव आणि एक कॅाफी. आता गुढघ्याला नक्की किती लागलय ते बघितल. जास्त खोल जखम नव्हती, वरचेवर खरचटल होत आणि थोडंसं रक्त आलं होतं पण ते ही सुकल होत. तिथेच थोडा वेळ बसुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मेसेजेसना धन्यवाद पाठवले. घरच्यांशी बोललो. समाजमाध्यमांवर महडचे आणि जखमी झालेल्या गुढघ्याचे फोटो टाकले आणि साडेआठ वाजता परतीचा प्रवास सुरु केला.




आता खरी कसोटी होती. सुर्य बऱ्यापैकी वर आला होता. ऊन सुद्धा वाढत जाणार होत. मी माझे विश्रांतीचे पाडाव आधीच ठरवले. चौकच्या पुढे पोहचल्यावर एक झाडाखाली उसाची गाडी बघुन तिथे थांबलो. इथे येईपर्यंत एक जाणवल ते म्हणजे परतीच्या रस्त्याला उतरणं जास्त आहे. बराचवेळा बिनापेडल सायकलने खुप अंतर पार केल. पण चढ लागल्यावर उभं राहुन पेडल मारत सायकल वर आणावी लागायची. त्या उसाच्या गाडीवर रस प्यायलो आणि १५ मिनिटे उसंत घेतली. आता पर्यंत माझ्या मित्रांना माझ्या गुडघ्याचा पराक्रम मी टाकलेल्या फोटो मुळे समजला होता. त्यांचे फोन सुरु झाले. कुठे आहेस आता, न्यायला येऊ का, जास्त लागलय का. त्यांना सांगितला काही नाही मी फीट आहे. पुढे शेडुंग फाट्या जवळ एक पाडाव घ्यायचा विचार होता पण छानशी जागा मिळाली नाही म्हणुन सायकल रेमटवत राहीलो. रसायनी फाट्यापासुन तर जी वाहतुक कोंडी सुरु झाली ती पळस्पे फाट्यापर्यंत. तिथे थांबायचा प्रश्नच नव्हता. मला तसा त्या कोंडीचा त्रास झाला नाही. मी बाजु बाजुने सायकल काढत पळस्पे फाटा ओलांडला. आता रस्ता मोकळा होता, तिथे सावलीत एक शहाळेवाला बघुन तिथे थांबलो. 

आता शेवटचे २० किमी राहीले होते. उत्साह पुर्ण ओसरून त्याची जागा थकव्याने घेतली होती. कधी एकदा घरी पोहचतोय असं वाटु लागल. बाजुने एखादा टेम्पो, छोटा हत्ती गेला तर मनात एक क्षणिक विचार येऊन जायचा की त्यांना बोलाव, अरे मला घेऊन जा. पण नाही घेतला संकल्प पुर्ण करायचा. एवढा पण थकलेलो नव्हतो. सकाळी जो जेएनपीटीचा रस्ता आरामात पार केला तोच आता सगळ्यात जास्त त्रास देत होता. वरती ऊन, विमानतळाच्या कामामुळे हवेत पसरलेली धुळ आणि त्यात सारखे रस्त्यावर असणारे पुल. पुर्ण दमछाक. जिथे शक्य तिथे पुल न घेता खालूनच गेलो. मनाला मजबुत करत, स्वतःलाच प्रोत्साहन देत साडे अकरा वाजता उळवेला आलो. बस थोडच राहीलय आता. फक्त तीन पुल ओलांडायचे. उळवेच्या पुलाखाली लिंबुसरबत घेतला. आता घराची खुपच ओढ लागली.

शेवटचे ते तीन पुल पुर्ण ताकदीनिशी पार केले आणि पामबीचला आलो. जीव भांड्यात पडला. हे तर आपलं नेहमीचच आता. तरीही सीवुड्स मॅाल समोर परत एकदा ऊसाचा रस घेतला आणि आलो घरी एकदाचा. साडेबारा वाजले होते. काहीतरी वेगळ केल्याचा आता अभिमान वाटत होता. सायकल घेतल्यापासुनचीच ही एक माझी इच्छा होती जी पुर्ण केल्याचा आनंद वाटत होता. बाप्पाचे मनोमन आभार मानले. आंघोळ केली आणि झोपुन गेलो.